कान्होजी आंग्रे यांचे पुत्र तुळाजी आंग्रे यांच्याबद्दल या महत्वाच्या गोष्टी माहित आहेत का ?

मंडळी, कान्होजी आंग्रे यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. आज वाचूया कान्होजी आंग्रे यांचे पुत्र तुळाजी आंग्रे यांच्याबद्दल काही दुर्मिळ माहिती !!
तुळाजी आंग्रे यांनी कोकण प्रांतावर आपली पकड घट्ट बसवली होती. रयत सुखावली होती. स्वस्ताई होती. शेती व इतर व्यवसाय समृद्धीकडे तुळाजी आंग्रे जातीने लक्ष घालीत असे. शिक्षणाच्या दृष्टीने शाळा आणि इतर व्यवसायांचे प्रशिक्षण मिळे. बंदरे आणि व्यापार भरभराटीचा होता. न्यायव्यवस्था चोख होती. धर्माची मोकळीक आणि जनतेला सुरक्षा होती. याच काळात त्यांनी आपले आरमार अधिक बलवान आणि आधुनिक करण्यासाठी पावले उचलली. त्यांनी वडिलांच्या म्हणजेच कान्होजी आंग्रे व संभाजी आंग्रे यांच्या हाताखाली उमेदवारी केली होती. आणि त्याचा उपयोग करत आरमारात आणखी सुधारणा केल्या. जहाज बांधणी लागणाऱ्या सागवानाची लागवड कोकणात सुरू केली. आरमारी जहाज बांधणीसाठी सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग येथे सरकारी कारखाने स्थापले. जहाज बांधण्याची कला त्यावेळी पूर्णत्वास गेली होती. इंग्रज कारखान्यात तयार होत त्या तोडीची सहाशे ते तेराशे टन वजनाची व्यापारी जहाजे तयार होऊ लागली. आंग्रे यांच्या आरमारातील 18 ते 20 तोफा ओतण्याचे त्यांचे स्वतःचे कारखाने होते.
विजयदुर्ग (स्रोत)
आरमारावरील कर्मचाऱ्यांची निवड पश्चिम किनाऱ्यावरील समुद्राशी पिढीजात संबंध असलेल्या जातीमधून केली जाई. यात गुजरात मधील खारवी, महाराष्ट्रातील कोळी, भंडारी आणि कोकणी मुसलमान तर कर्नाटकातील आंबी यांचा समावेश होता. याशिवाय दर्यावर्दी लोक शोधून त्यास आरमारात भरती होण्यासाठी प्रयत्न केले जात. आरमारावर उत्तम प्रकारचा दारूगोळा आणि तोफा साठवलेला असे. तोफा चालवण्यासाठी युरोपियन आणि देशी गोलंदाज असत. आरमारात दुर्बीण, होकायंत्र यासारखी आधुनिक उपकरणे आली होती. कुशल सारंगी आणि दर्यावर्दी मनुष्यबळ असलेल्या या आरमारासाठी स्वतःची किल्ले आणि सुरक्षित जागा उपलब्ध होत्या. तुळाजी आंग्रे यांच्या आरमारात गलबत, गुरब, पट्टेमार, तीरकाठी, मनवर, बागला, बतेला, बोटील, महागिरी, पाल, पगार, तरणी, कतुर, करवल, तरवे, सिबाद,अशी एक्कावन्न प्रकारची जहाजे होती. प्रत्येक जहाजाची सामर्थ वेगवेगळे असे. तुळाजी आंग्रे यांनी आपले सर्व किल्ले आणि ठाणे बळकट करून ठेवली होती. यात विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, अंजनवेल, जयगड, पूर्णगड, पालगड, रसाळगड, रत्नागिरी, प्रचितगड, भैरवगड, बानकोट, गोवळकोट, कनकदुर्ग, गोवेदुर्ग, फत्तेदुर्ग, यशवंतगड इत्यादी 27 ठाणे आणि 30000 चे घोडदळ तयार केले होते.
गुरब (स्रोत)
तुळाजी आंग्रे यांनी 1743 ते 54 या काळात आंग्र्यांचे दस्तक नाही अशी जहाजे धरण्याचा आणि लुटण्याचा सपाटा लावला. पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रजांच्या जहाजांवर अनेक हल्ले करून त्यास पकडले होते. इंग्रजांचे मद्रासचे शार्लोट, मुंबईकरांचे विल्यम, कलकत्त्याची सेवेर्न, डर्बी, रिस्टोरेशन, पायलट नावाचे स्लुप, सुरतेची दादाभोई आणि ऑगस्टा मंगलोरचे रोज आणि अँन मलबारचे बेन्जामाल्ली, मस्कतचे फत्ते दौलत इतक्या जहाजांना लुटले होते.
लेखक : रवि पार्वती शिवाजी मोरे