जाणून घ्या भारतीय ध्वजाबद्दलच्या काही रोचक आणि ज्ञानवर्धक गोष्टी...
सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा मंडळी!! खरंतर आज आकाशात दिमाखाने फडफडणारा तिरंगा पाहून सर्वांचीच छाती अभिमानाने फुलून आली असेल. म्हणूनच भारताचा अभिमान असणार्या या तिरंगा ध्वजाबाबत आम्ही तुमच्यासाठी थोडी रोचक आणि ज्ञानवर्धक अशी माहिती आणलीय.
आज आपण जो तिरंगा फडकावतो त्याला २२ जुलै १९४७ रोजी भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून स्वीकारलं गेलं. हा तिरंगा बनवण्याचा मान जातो आंध्रप्रदेशच्या पिंगली वेंकैय्या या स्वातंत्र्य सेनानीला. खेदाची बाब म्हणजे राष्ट्रीय ध्वज निर्माण करणार्या या गरिब व्यक्तीचं निधन १९६३ साली एका झोपडीत झालं.
पिंगली वेंकैय्या (स्त्रोत)
घटना बनण्याआधी राष्ट्रपतीपदच नसल्याने पंतप्रधान हेच देशाचे प्रमुख होते. घटना निर्मीतीनंतर राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख झाले. त्यामुळे आपल्या देशात स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर पंतप्रधानांकडून ध्वज फडकावला जातो, तर प्रजासत्ताक दिनाला राजपथावर राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज फडकावला जातो.
कर्नाटकातल्या हुबळीमधल्या कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ या एकमेव परवानाप्राप्त संस्थेकडून तिरंगा बनवला जातो. व इथूनच त्याचा सर्वत्र पुरवठा केला जातो.
आपल्या देशात भारतीय ध्वज संहिता (फ्लॅग कोड अॉफ इंडिया) नावाचा कायदा आहे. जो तिरंगा फडकावण्याचे नियम निर्धारीत करतो. यानुसार एखाद्याने चुकीच्या पध्दतीने तिरंगा फडकावल्यास त्याला कारावास आणि दंडही होऊ शकतो.
तिरंगा नेहमी सुती, रेशीम किंवा खादीपासून बनलेला असावा. प्लॅस्टिकपासून ध्वज बनवण्यावर बंदी आहे. त्याचप्रमाणे तिरंगा हा नेहमी ३:२ या गुणोत्तरात आयताकृती आकाराचा असला पाहिजे असा नियम आहे. तसेच अशोकचक्रात २४ आरे असणेही आवश्यक आहे.
ध्वजावर काहीही लिहीणं किंवा ध्वज एखाद्या वाहनाच्या मागे, बोटीवर, विमानात लावणं बेकायदेशीर आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत ध्वजाचा जमिनीला स्पर्श होता कामा नये असाही नियम आहे.
कोणत्याही अन्य ध्वजाला तुम्ही राष्ट्रीय ध्वजासोबत किंवा त्यापेक्षा उंच लावू शकत नाही. राष्ट्रीय ध्वजाचं स्थान हे सर्वोच्च असतं. लोकांना घरात आणि कार्यालयात सामान्य दिवशी तिरंगा फडकावण्याची अनुमती २२ डिसेंबर २००२ नंतर देण्यात आली.
२९ मे १९५३ रोजी भारतीय तिरंगा नेपाळी ध्वजासोबत पृथ्वीवरील सर्वात उंच शिखर असणार्या माऊंट एव्हरेस्टवर फडकावला गेला. यादिवशी शेरपा तेनझिंग् आणि एडमंड माउंट हिलरी या दोघांनी एव्हरेस्ट सर केला होते.
देशासाठी प्राण देणार्या शहिद जवानांच्या आणि देशातील महान व्यक्तींच्या पार्थिवावर तिरंगा लपेटला जातो. यावेळी केसरी पट्टी ही डोक्याकडे आणि हिरवी पट्टी ही पायांकडे ठेवली जाते. मृतदेहासोबत तिरंग्याला दहन किंवा दफन न करता नंतर तो गोपनीय पध्दतीने सन्मानपूर्वक जाळला जातो किंवा त्याला जलसमाधी दिली जाते. फाटलेल्या, रंग गेलेल्या तिरंग्यालाही याच पध्दतीने विसर्जित केलं जातं.
भारतातील सर्वात उंच तिरंगा हा ३६० फूट उंच आहे आणि तो अटारी (वाघा बॉर्डर) याठिकाणी आहे. त्यानंतर आपल्या कोल्हापूरात उभारण्यात आलेल्या ३०० फूट उंच तिरंग्याचा क्रमांक लागतो. भारतात संसद भवन हे एकमात्र भवन आहे जिथं एकाचवेळी ३ तिरंगे फडकावले जातात.
तर कशी वाटली मंडळी आपल्या तिरंग्याविषयीची माहिती? आवडली तर शेअर करायला विसरू नका!
जय हिंद !!