१२वीत ९९.९% गुण मिळवलेल्या या टॉपरला काय बनायचंय? वाचून धक्का तर लागणारच...
तर मंडळी, शालेय जीवनात सर्वसाधारणपणे आपल्या सर्वांची स्वप्नं कॉमन असतात. करिअरच्या बाबतीत तर दोनच पर्याय. एकतर मी डॉक्टर होणार, किंवा इंजिनिअर. समजा आपली नसलीच तरी आपल्या पालकांची तरी आपल्याकडून तीच अपेक्षा असते. पुढे जाऊन या सगळ्याला कसा सुरूंग लागतो ते आता इथं सांगायला नको. पण अभ्यासू आणि जिद्दी मुलं-मुली मात्र डॉक्टर, इंजिनिअरिंग, किंवा स्पर्धा परीक्षेंच्या क्षेत्रात जाऊन आपलं भविष्य उज्ज्वल बनवतात. पण इथे केस थोडी वेगळी आहे. काय आहे? या बघूया....
वार्शिल शाह. हा मुलगा गुजरात बोर्डाचा टॉपर आहे. यंदाच्या १२वीच्या परिक्षेत त्याने ९९.९% असा सर्वोच्च स्कोअर मिळवलाय. पण पुढे जाऊन तो कोणी डॉक्टर, इंजिनिअर, सायन्टिस्ट, किंवा कलेक्टर बनणार नाहीय. तो बनलाय एक जैन भिक्षू!! हो. बोर्डात पहिल्या आलेल्या या विद्यार्थ्याने एक आगळावेगळा मार्ग स्विकारून जैन भिक्षू बनण्याचा निर्णय घेतलाय. कालच त्याने विधीपुर्वक दिक्षाही घेतली आहे. आश्चर्य म्हणजे त्याच्या कुटुंबाचाही त्याला पूर्ण पाठींबा आहे! जगाच्या शांतीसाठी हाच रस्ता योग्य आहे. असं त्यांचं मत आहे.
वार्शिलचे आईवडील आयकर अधिकारी आहेत. जैन धर्माचे अनुयायी असलेलेलं हे हे कुटूंब अत्यंत साधेपणानं आपलं जीवन जगतं. वार्शिलच्या घरी टिव्ही, फ्रिज तर सोडाच पण विजेचा वापरही वर्ज्य आहे. फक्त रात्रीच्या वेळी आणि तेही क्वचितच ते विजेचा वापर करतात. वार्शिलने हा निर्णय पालकांच्या दबावातून घेतलेला नाहीय मंडळी. त्याचा कल आधीपासूनच अध्यात्माकडे झुकलेला आहे.