कविता महाजन यांच्या मुलाखतीतील काही अंश- जाणून घ्या ब्र आणि भिन्नबद्दल कविताताई काय म्हणतात..

कविता महाजन. 'ब्र' या पहिल्याच कादंबरीमुळे एकदम प्रकाशझोतात आलेलं नाव. पुढे  'भिन्न' आली. मराठी पुस्तकांच्या विश्वातील एक वेगळा प्रयोग म्हणून तिच्याकडे पाहिलं गेलं. दोन वेगळीच विश्वं - जी वास्तवात अस्तित्वात होती, पण मराठी वाचकाच्या जीवनवर्तुळाच्या परिघावर किंवा त्याबाहेर असावीत - ती एकदम सामाजिक घुसळणीच्या मध्यभागी आली. जगण्याचे अनुभव ललित पण वास्तववादी लेखनाच्या स्वरूपात मांडत नेण्याचा हा प्रवास समृद्ध करणारा आणि पुढच्या सृजनासाठी अस्वस्थही करणारा. कसा आहे हा प्रवास? कशी आहेत त्यातील वळणं आणि चढउतार?  या प्रवासासाठी लागणारी शक्ती कशी मिळते?  समंजस वाचकांच्या मनांत - मग त्यात कविता महाजनांचे चाहतेही आले आणि टीकाकारही आले - कायमच वास्तव्य करून असणारे हे प्रश्न. याच प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी २०१०मध्ये 'पुस्तकविश्व'च्या दिवाळी अंकासाठी त्यांची मुलाखत घ्यायची ठरवलं खरं, पण या उपक्रमाला मुलाखतीचं स्वरूप येणार नाही हे आधीच जाणवलं होतं. प्रत्यक्ष गप्पा-चर्चेमध्ये तेच झालं. लेखनाची प्रक्रिया, जगण्यातील अनुभवांची त्यात होणारी गुंफण, आसपासच्या प्रश्नांची मांडणी आणि त्यावर तोडगे शोधताना असणारी सृजनशील क्रियांची भूमिका किंवा स्थान असे एकेक मुद्दे खुलत गेले. ९० मिनिटांहून थोडा अधिक काळ चाललेल्या या चर्चेतून कविता महाजन उलगडल्या; कादंबरीकार-लेखक कविता महाजन उलगडल्या; सामाजिक प्रश्नांकडे जाणत्या नजरेनं पाहणार्‍या कार्यकर्त्याही उलगडत गेल्या. त्या मुलाखतीमधला त्यांच्या ब्र आणि भिन्नबद्दलच्या अनुभवांचा काही अंश आम्ही बोभाटाच्या वाचकांसाठी आज देत आहोत.

स्रोत

कादंबरी किंवा तत्सम कृती, त्याला मिळणारा प्रतिसाद आणि त्यातून होणारी आपली जडणघडण याविषयी बोलताना कविता महाजनांनी आरंभीच सांगून टाकलं की 'ब्र'ला सहा महिन्यांनी भरपूर प्रतिसाद मिळायला सुरूवात झाली आणि त्यांचं वैयक्तिक विश्वही बदलून गेलं. मोठ्या वाचकवर्गापर्यंत पोचल्याचा अनुभव आल्याचं त्या आवर्जून सांगत गेल्या. मग विषय आपसूक 'ब्र'ला धरून झालेल्या वादाकडंही वळलाच. “सुरूवातीला हिला कादंबरी म्हणायचे की नाही, इथूनच वाद सुरू झाले. माझा मुद्दा असा होता की आपल्याकडे वेगवेगळ्या रूपात कादंबर्‍या येतात. पत्ररूपात, इमेलरूपात. डायरीरूपात, कवितारूपात कादंबर्‍यार आहेत. म्हणजे अनेक फॉर्म्स वापरले गेले आहेत. तर माझा मुद्दा असा होता की ही रिपोर्ताजचे स्वरूप असलेली कादंबरी आहे. काही ठिकाणी प्रसंगातली नावे वगैरे बदललेली असू शकतात, पण बाकीचे सगळे खरेखुरे असते. त्यामुळे त्याला एक अधिकृतपणा येतो. त्यामुळे ते खरे आहे, वास्तव आहे, अनुभवातून लिहिलेले आहे असे त्याच्या बाबतीत म्हटले जाते”, कविता सांगत असतात.

व्यक्तिरेखाटनाची प्रक्रिया मात्र सरळ नसतेच नसते. तीही एक गुंतागुंत असते. पुस्तकातील व्यक्तिरेखा प्रत्यक्षात शोधण्याचा एक प्रयत्न वाचक करत असतोच. त्याविषयी त्यांना काय वाटतं? त्या सांगतात, “इथे गंमत अशी होती की हे सगळे जे काही ’ब्र’ मधले लेखन आहे, ते अनुभव माझे स्वत:चे होते. काही माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांचे होते. त्या वेगवेगळ्या लोकांचे अनुभव तिथे मिसळलेले होते. मला वाचकांची पत्रे किंवा फोन यायचे की आम्हाला त्या डॉ. दयाळांचा पत्ता सांगा. त्यावेळेस मला त्यांना सांगावे लागे की हे दयाळांचे पात्र मी किमान बारा लोकांवरून घेतलेले आहे. त्यात फक्त पुरूषच नाहीत तर बायकादेखील आहेत. म्हणजे ती एक वृत्ती असते. त्या वृत्तीवरून ती जी काही आहेत ती पात्रे बनत जातात. वडगाव नावांची गावे कितीतरी आहेत. ‘ब्र’ मधलं वडगाव तुम्हांला कुठेच सापडणार नाही; अथवा ते सगळीकडेच दिसेल. हा जो भाग आहे की सगळी सरमिसळ, यांना एकत्रित ठेवून नवीन रूप बनवून देणं, हे जे कादंबरीकार करतो तेच इथे केले आहे. फक्त यासाठी रिपोर्ताजचा फॉर्म वापरल्याने लोकांना ते सगळे इतके खरे, जिवंत वाटलं आहे. लोक त्याला रिपोर्ताज म्हणतात किंवा तुमचे आत्मचरित्र आहे का म्हणतात, ही मला पोचपावती वाटते. कारण लोकांना ते तितके वास्तववादी, रिऍलिस्टिक वाटते आहे. त्यामुळे त्या संघर्षात मी फारशी पडले नाही. समीक्षकांनी त्यावर भरपूर टीका केली. त्यानंतर मात्र महत्त्वाचे असे बारा पुरस्कार ‘ब्र’ला मिळाले. त्यानंतर अमाप वाचकप्रियता मिळाली आणि नंतर हे टीकेचे मुद्दे अक्षरश: अगदी वाहून गेले.”

स्रोत

ब्र’ आणि ‘भिन्न’ यांच्यावरील प्रतिसादांत एक वेगळेपण आहे. ते सांगताना कविता महाजन म्हणाल्या, “‘भिन्न’च्या बाबतीत सुरूवातीचा काही काळ खूप टीकेत गेला. कारण ‘ब्र’च्या इंप्रेशनने लोक ‘भिन्न’कडे वळले होते. ‘ब्र’ची भाषा वेगळी. मूस वेगळी. ‘भिन्न’ची गरजच पूर्णपणे वेगळी होती. त्यामुळे ‘भिन्न’मधली भाषा आणि ‘ब्र’मधली भाषा अगदी वेगळी आहे. दोन्ही पुस्तके दोन हातांनी लिहिली असावीत इतके त्यात कॉण्ट्रास्ट आहे. साम्यस्थळेही आहेत, परंतु भाषेच्या बाबतीत म्हणा किंवा इतरही बाबतीत म्हणा, फरक आहेच. विषयच एड्स असल्याने त्यात सेक्स-बेस्ड वर्णने आली, त्यामुळे ते वादग्रस्त ठरले. पंढरपूरच्या रेड लाईट एरियाच्या उल्लेखामुळे सुरूवातीला बरीचशी वादळं उठली. म्हणजे लोकांना धक्का बसला. त्यांना वाटायचे की हे आहे पण हे आमच्या दारापर्यंत नाही. आणि नंतर असाही सूर होता की हे आहे, परंतु मग हे लिहिलेच पाहिजे का? मग लिहिले तर ठीक आहे पण मग ते याच भाषेत लिहिले पाहिजे का? हे दोन मुद्दे ‘भिन्न’च्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात आले. आणि पुरूष लेखकांनी त्यातल्या काही गोष्टी यापूर्वी लिहिल्या होत्या (उदा. पुरूषवेश्या). परंतु ते गंमतीने, चवीने, बघा बायकापण काय मजा करतात; या टोनमध्ये होतं. पण एखादी बाई जेव्हा असा पुरूष वापरते तेव्हा तिच्या काय घालमेली असतात, तिच्या काय गरजा असतात, तिची मानसिकता काय असू शकते हे बाईच्या ऍंगलने कुणी लिहिले नाहीय. आणि मग ते अनेकांना धक्कादायक वाटले. म्हणजे काही गोष्टी धडधडीतपणे समोर असतात, त्याकडे पूर्णपणे पाहण्याची तुमची हिंमत नसते. किंवा बघितल्या तरी त्या इतरांपुरत्या आहेत, त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही, अशी भूमिका असते. हे जे काय प्रकार आहेत त्यामुळे लोकांच्या अनेक समजांना धक्के बसत गेले. त्यामुळे ‘भिन्न’चाही सुरूवातीचा काळ खूप टीकेचा गेला. ‘ब्र’मुळे तयार झालेल्या प्रतिमेला त्याने तडा गेला होता. पण नंतर जे ‘ब्र’च्या बाबतीत झाले, तेच ‘भिन्न’च्या बाबतीत झाले. चार-सहा महिन्यांत चित्र बदलले. त्यालाही पुरस्कार मिळाले, त्या पुरस्कारांच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रतिसाद लाभले. मला ‘भिन्न’चे पुरस्कार जास्त महत्त्वाचे वाटतात, कारण ‘भिन्न’वर चांगली समीक्षा झाली. ‘भिन्न’ला पुरस्कार देणारी जी समिती होती, त्यांनी चांगली समीक्षा केली.”

 

ब्र’ आणि ‘भिन्न’! दोन्हींची मूस वेगळी, जातकुळी वेगळी. स्वाभाविकच वाचकाला येणारे अनुभवही भिन्न. लिहितानाचे काय? त्यातही दृष्टिकोनांची भिन्नता असणारच. त्या म्हणतात: “या दोन्ही कादंबर्‍यांमध्ये मी वेगळे विश्व मांडले. ही दोन्ही भिन्न स्वरूपाची विश्वं लोकांच्या सरसकट जवळपास होतीच असे नाही. अनुभवांच्या कक्षेत होतीच असे नाही. आदिवासी माहीत असतात किंवा रेडलाईट एरियाज माहीत असतात. कधीतरी तिकडून गेलेलो असतो; पण प्रत्यक्षात तिथे काय चालते, तिथे ती माणसं कशी येतात, त्यांचे काय व्यवहार चालतात, त्यांच्या अडचणी काय असतात, किंवा त्यांच्या आनंदाच्या जागा काय असतात; ही जी काही सुखदु:खे असतील, त्या जगातल्या काय घडामोडी असतील, त्या सगळ्या समोर येणं आणि तेही एका बाईच्या नजरेतून समोर येणं असे यात अनेक भाग आहेत. समाजात एक प्रकारचा विरोधाभास आहे किंवा दुटप्पीपणा आहे.  समाज नावाची एकच गोष्ट नाहीय किंवा संस्कृती नावाची एकच गोष्ट नाही. जेव्हा आपण कुठल्याही वर्तुळाच्या आत शिरतो, तेव्हा त्याच्यात आत असंख्य कप्पे पडलेले आपल्याला दिसतात. मग ते आर्थिक, सामाजिक, धार्मिक, लिंगभेद अशा कुठल्याही मुद्यांवर आधारित असू शकतात. दोन्ही कादंबर्‍यांततून ती अशी वेगळी जगं मांडलेली होती.”

स्रोत

लेखन परिपक्व असावे की थोडेसं ओबडधोबड? कधी कधी ते ओबडधोबड लेखन वाचकांना आवडतं तर कधी प्रगल्भ, मुरलेल्या लेखनाला वाचकांची पसंती असते. पण कविता महाजनांच्या लेखी हे दोन्ही प्रकार आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ. खुद्द त्यांचा स्वतःचाच दोन्ही कादंबऱ्यांच्या संदर्भातील अनुभव तोच आहे. ‘ब्र’ लिहिताना आपण कादंबरी लिहितो आहे हेच आपल्याला ठाऊक नव्हते, हे त्या सांगतात आणि पुढे पुस्तीही जोडतात की ‘भिन्न’च्या वेळी मात्र मी कादंबरीच लिहित होते. त्या म्हणतात, “एखादी गोष्ट जी आपण वास्तवात करू शकत नाही ती स्वप्नात करतो. पण स्वप्नातल्या वागण्यातही मर्यादा असतात आणि त्या मर्यादेपलीकडे काही घडण्याआधी आपण जागे होतो. ही जी आपल्या अंतर्मनात दडपणे असतात, सेन्सॉरशिप्स असतात, त्या असतातच. आणि एखाद्या विशिष्ट वयामध्ये, जोपर्यंत त्या विशिष्ट अशा सेन्सॉरशिपची सुरूवातच झालेली नसते, तेव्हा ते सगळे अस्सल, स्वतंत्र असते. नारायण सुर्व्यांची कविता वेगळी राहिली कारण त्यांनी शिक्षणच घेतले नव्हते. त्यामुळे शिक्षणात जी काही दहा-पंधरा वर्षांत विचार तयार होण्याची प्रक्रिया होते ती त्यांच्याबाबतीत झाली नाही. इतर लेखकांचे जे काही लिखाण आपण वाचतो, त्यातूनही संस्कार होतात. हे सगळे संस्कार त्यांच्यावर झालेलेच नव्हते. त्यांच्यावर जे संस्कार होते ते सगळे शेरोशायरीचे, आजूबाजूच्या वातावरणाचे, चळवळीच्या गाण्यांचे संस्कार होते. त्याच्यामुळे सुर्वेंची कविता एकदम वेगळी बनून गेली. तर हा जो भाग आहे की लेखक किती रॉ आहे, तो इथे महत्त्वाचा ठरतो. माझ्याच बाबतीत बोलायचे झाले तर मलाच स्वत:ला ‘ब्र’ च्या वेळी माहीत नव्हते की मी कादंबरी लिहितेय. मी सुरूवात केली आणि नंतर जाणवले की हे काहीतरी वेगळं आणि मोठं होतंय. मी दोनेकशे पानांनतर थांबले आणि माझे एक कादंबरीकार मित्र आहेत त्यांना ते दाखवले. आणि ते म्हणाले की ही कादंबरी आहे, आणि ती व्यवस्थित पूर्णपणे लिही. हा अनुभव पहिलटकरणीसारखा असतो. दुसर्‍या वेळेस नीट होत जातं. तसंच काहीसं माझ्याबाबतीत झालं. ‘भिन्न’च्या वेळी मला माहीत होते की मी कादंबरी लिहितेय. ‘ब्र’च्या वेळी मला हे काहीही माहीत नव्हते, त्यामुळे जे मनात आले ते सगळे मी उतरवत गेले. या लेखन रॉ असण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात. लेखकाच्या लेखन फिनिश्ड असणं, फाईन असणं; म्हणजे एखादे कोरीव काम आपण पाहतो तेव्हा ते ओबडधोबड असणं हे देखील एखाद्या शिल्पाचे वैशिष्ट्य असू शकते. आणि दुसर्‍या  एखाद्या संगमरवरी मूर्तीचा अगदी कण न् कण कोरून आखीवरेखीव असू शकतो. दोन्हीही शिल्पेच. त्यामुळे ते रॉ आहे की कोरीव आहे यावर तुम्ही त्याचे सौंदर्यमापन करूच शकत नाही. ते वाचकाच्या पसंतीवर अवलंबून आहे की त्यांना कशा प्रकारचे लेखन आवडेल.”

 

कविता महाजन त्यांच्या या मुलाखतीतून बरंच काही सांगून जातात.  ज्येष्ठ लेखिका- कवयित्री, अनुवादक, सामाजिक कार्यकर्ती अशा अनेक भूमिका निभावणाऱ्या कविता महाजनांचं २७ सप्टेंबर रोजी आकस्मिक निधन झालं. मराठी सारस्वतात आणि वाचकांस कविता महाजनांची कमतरता नक्कीच  जाणवत राहील.

सबस्क्राईब करा

* indicates required