computer

स्किम आणि स्कॅम : लोक फसतात, रडतात, पुन्हा फसतात । पण शहाणपणा का येत नाही ?

एकेकाळी आर्थिक घोटाळे फक्त मुंबईतच व्हायचे, बर्‍याचवेळा असंही व्हायचं की घोटाळ्यांची सुरुवात मुंबईत व्हायची आणि नंतर त्याची व्याप्ती देशभर व्हायची.आता थोडीशी वेगळी परिस्थिती आहे.घोटाळे सार्वत्रिक झाले आहेत.जोडीला बीटकॉईनच्या नावाखाली चालणारे नवे घोटाळे जन्माला येत आहेत. प्रत्येक घोटाळ्यात नेमकं काय होतं हे समजणं सोप्प आहे. कमीतकमी वेळात पैसे दुप्पट -तिप्पट होण्याचे आमिष दाखवणारे लोक पुढे येतात. त्यांचा प्रचार करणारे नेमले जातात.छोट्या छोट्या लोकांना भूरळ घातली जाते.त्यानंतर काहीच दिवसात हे जाळं मोठ्ठं होत जातं आणि एक दिवस कोसळतं ! 
ही एक प्रकारची रोगाची साथच आहे असं म्हणावं लागेल.ही महामारी  दर पाच दहा वर्षांनी येतं.लोकांचे पैसे मारून टाकते.लोक फसतात, रडतात, पुन्हा फसतात । काही काळापुरते शहाणे होतात.काही वर्षांनी पुन्हा फसतात.पण मोह सुटत नाही.

तीन महिन्यात पैसे दुप्पट.सहा महिन्यात आयुष्य चौपट!!

या घोटाळ्यांचं वर्गीकरण करायचं झालं तर असं करता येईल की एक प्रकार म्हणजे सर्वसामान्य माणसांना भूलथापा देऊन त्यांची बचत एक खोटी स्किम बनवून गिळंकृत करणारे घोटाळे आणि दुसरा प्रकार म्हणजे मुंबईच्या अर्थविश्वातील बँका ,शेअरबाजार, भांडवली बाजार यांना गंडा घालणारे घोटाळे.
पहील्या प्रकारात डॉ उमेश खाडेंची कल्पवृक्ष मार्केटींग ,उदय आचार्यची सीयु मार्केटींग,बेस्ट कर्मचारी शेरेकर स्किम, एमू पक्षी, ससे, सागाची झाडे, गाड्या भाड्यानी लावण्याची स्किम- नावं सांगावी तितकी कमीच आहेत ! सोबत उल्लेख केलेल्या कंपन्यांनी प्रत्येकी जवळ जवळ पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचा अपहार केला आहे. गरीब गुंतवणूकदारांचे प्रॉव्हीडंट फंडाचे पैसे,स्वेच्छा निवृत्तीचे पैसे ,अडीनडीला घरात असावेत म्हणून गृहीणींनी ठेवलेले पैसे,बॅकेपेक्षा चार पैसे जास्त मिळतील म्हणून ठेवलेले पैसे -हे सगळे पैसे या कंपन्या आणि त्यांचे प्रतिनिधी तळहातावर ताजमहाल दाखवून खाऊन टाकतात.

आज दोन घोटाळ्यांची उदाहरणे देतो आहोत.

ज दोन घोटाळ्यांची उदाहरणे देतो आहोत.
आर्थिक गुन्हे विभाग युनीट नंबर चार -केस नंबर 108/2002
लागू झालेली कायद्याची कलमे  U/s.406, 420, 34,120( IPC)
गुन्हा घडण्याची तारीख.ऑक्टोबर २००५
तक्रारदाराचे नाव: कैलाश हरीभाऊ घोंगे
पोलीस अधीकार्‍याचे नावः पो.इ. अजीत सुर्वे
आरोपी:१. संदीप उर्फ राजू कांदळकर २. श्रीराम मयेकर
शांताराम नाईक आणि इतर अरुण शेट्टी गणेश शेट्टी
थोडक्यात गुन्ह्याचे वर्णन 1. संदीप उर्फ राजू कांदळकर 2. श्रीराम मयेकर ३ शांताराम नाईक आणि इतर यांनी गुंतवणूक दारांना टाटा इंडीका भाड्यानी लावून देऊन त्यावर महीना २५००० रुपये कमवून देण्याचे आमीष दाखवले.गुंतवणूकीची रक्कम एका गाडीच्या किमती इतकी.!

सहा महीन्याच्या अवधीत ३३ कोटी रुपये जमा करून आरोपी फरार झाले.
आरोपी क्रमांक एक अजूनही फरार आहे.एकूण ताब्यात आलेल्या मालमत्तेची किंमत अंदाजे दोन कोटी.खटला न्यायालयात चालू आहे.
आजची स्थिती:आरोप पत्र दाखल झाले आहे.(२००९)

 

प्लँटेशनवाल्यांनी गुंतवणूकदाराचा बळी दिला !

छोट्या गुंतवणूकदारांना ठगवण्याचे काम प्लँटेशन कंपन्यांनी जोरात केले.  निलगीरी, साग, भाजीपाला,कोंबड्या,अंडी,बकर्‍या, मेंढ्या, ससे सगळं काही प्लँटेशनच्या नावाखाली विकून जनतेकडून पैसा गोळा केला जात होता.
 आपण बघतो की नेहेमी बकर्‍याचा बळी दिला जातो.सागाच्या फार्म आणि इतर प्लँटेशनवाल्यांनी गुंतवणूकदाराचा बळी दिला.
ऍरो ग्लोबल ऍग्रोटेक कंपनीचे उदाहरण बघा.उदय गोयलच्या या कंपनीत एकूण ४३००० गुंतवणूकदारांचे पैसे नाहीसे झाले. या गायब झालेल्या बर्‍याचशा पैशाचा विनीयोग नातेवाईकांच्या नावावर जमीनजुमला घेतल्याचे हायकोर्टाच्या लक्षात आणून दिल्यावर ह्या मालमत्ता विकून पैसे वसूलीचे आदेश कोर्टानी दिले.उदय गोयल आणि ऍरो ग्लोबल ऍग्रोटेक केवळ हे प्रातिनिधीक उदाहरण आहे.ह्या सुमारास जवळजवळ पन्नासेक कंपन्या अशाच पध्दतीने जनतेचे पैसे गिळंकृत करत होत्या.काही कंपन्या तर अचानक नाहीशा पण झाल्या.

गरीबांना न्याय मिळतो का ?

मुद्द्याचा प्रश्न असा आहे की गरीबांना न्याय मिळतो का ? त्यांचे पैसे परत मिळतात का ?
 या प्रश्नाचे उत्तर असे आहे की बर्‍याच वर्षांनी म्हणजे बहुतेक गुंतवणूकदार म्हातारे होऊन मेल्यावर मूळ रकमेच्या २०ते ४० टक्के रक्कम मिळते. काही कंपन्यात तर मनस्तापाखेरीज काहीच मिळत नाही.
२०२० सालची गोष्ट आहे. बुडलेल्या पैशांची वसूली करून झाल्यावर गुंतवणूकदारांना पैसे परत देण्यासाठी मुंबई पोलीसांनी एक वेगळे खाते नेमले. त्यांच्या म्हणण्यानुसार एकूण ३३२९३ गुंतवणूकदारांचे पैसे जमा आहेत पण फक्त ११००० लोकांनी आजवर संपर्क केला आहे , बाकीचे २२००० गुंतवणूकदार कुठे गेले याचा काहीच सुगावा नाही. 
दुसरे उदाहरण सीयु मार्केटींग या कंपनीचे आहे.गुन्हा घडून आता २४ वर्षं झालीत. या कंपनीच्या मालमत्तेची वासलात लावून पैसे जमा आहेत. २९००० गुंतवणूकादारांपैकी फक्त ९२०० लोक आलेत ! बाकीचे कुठे आहेत ? मरण पावले असतील, घर बदलून गेले असतील, विसरून गेले असतील . 

घोटाळ्याचा दुसरा प्रकार म्हणजे मुंबईच्या अर्थविश्वातील बँका ,शेअरबाजार, भांडवली बाजार यांना गंडा घालणारे घोटाळे.या घोटाळ्यात बहुतेकवेळा सर्वसामान्य लोकांचे पैसे अप्रत्यक्षरित्या गायब होतात त्यामुळे हाहाकार माजत नाही. असे असले तरी फ्रॉडमध्ये आपल्या कल्पनेच्या पलीकडचे पैसे 'हव्वा' होत असतात.शेअर बाजार म्हटलं की पहिलं नाव आठवतं हर्षद मेहेताचं ! हा घोटाळा आजही अनेक कारणांनी गाजतो आहे.त्याच्याबद्दल आणखी काही सांगण्यापेक्षा इतर दोन गाजलेल्या स्कॅमची माहिती पुढच्या लेखात आम्ही देत आहोत !

सबस्क्राईब करा

* indicates required