computer

राजू केंद्रे- खेडेगावात शिकून थेट फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थान मिळवणारा विदर्भातला तरुण!! यांचे कार्य तर जाणून घ्या!!

"यश, पैसा , प्रगती करायची असेल तर शहरात जा." असा सल्ला तरुण पिढीला दिला जातो. पण आज आम्ही अशा युवकाची कहाणी सांगणार आहोत ज्याने खेडेगावात शिकून थेट फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलगा राजू केंद्रे याने हे यश मिळवून बुलढाण्याचे नाव उंचावले आहे.

राजू केंद्रे महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थांना उच्च शिक्षणासाठी मदत करतात. त्यासाठी त्यांनी एकलव्य फाउंडेशनची स्थापना केली. जी मुले क्षमता असूनही परिस्थिती नसल्यामुळे पुढे शिक्षण घेऊ शकत नाहीत अशांना मदत करणे हा एकलव्य फाउंडेशन स्थापन करण्यामागचा उद्देश होता. विशेषतः खेड्यात अनेकजण माहिती नसल्याने किंवा योग्य मार्गदर्शन नसल्याने इच्छा असूनही पुढे शिकू शकत नाहीत. या सर्व विद्यार्थ्यांसाठी अवघ्या विशीत राजू यांनी एकलव्यची सुरुवात केली. राजू केंद्रेंनी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास फेलोशिपमध्येही काम केलेले आहे. त्यांनी पारधी समाजासाठी विकासकामे केली आहेत. ग्रामीण भागात आजही अनेकजण उच्च शिक्षणासाठी लागणारी किंवा स्पर्धापरीक्षासाठी लागणारी पुस्तके मिळवू शकत नाहीत. त्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी पुणे, ठाणे, औरंगाबाद, यवतमाळ, अमरावती, मुंबई येथून ३० हजारांहून अधिक पुस्तके गोळा केली आणि ती ग्रामीण भागात ग्रंथालय उभी राहण्यासाठी वितरीत केली.

राजू केंद्रेंचा जन्म महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या पिंपरी खंदारे या छोटयाश्या खेड्यातला. कुटुंबात राजू हे शिकलेली पहिलीच व्यक्ती आहेत. राजूंचं शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. जिल्हाधिकारी होण्यासाठी त्यांनी पदवीच्या शिक्षणासाठी पुणे गाठले. पण पुण्यात त्यांना मार्गदर्शक मिळाला नाही. फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश करायचा होता, पण प्रवेशाची तारीख उलटून गेली होती. कुठेही प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी बीपीओमध्ये नोकरी करायचे ठरवले. पण तिथेही त्यांना ती भाषा आत्मसात करणे जमले नाही. शेवटी त्यांनी पुणे सोडले आणि परत गावी गेले. तिथे त्यांनी मुक्त विद्यापीठाअंतर्गत पुढचे शिक्षण सुरू ठेवले. २०१२ ला मुक्त विद्यापीठात शिकत असताना राजू यांना मेळघाट या आदिवासी भागात जाण्याची संधी मिळाली. मेळघाट मित्रच्या गटासोबत त्यांनी दोन वर्ष पूर्णवेळ काम केले.

टाटा इन्सिट्यूटमधून ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेताना राजू यांनी ग्रामपरिवर्तन चळवळीद्वारे स्वतःच्या गावातच काम करायचे ठरवले. त्यामध्ये त्यांना अनेक प्रश्न कळत होते. ग्रामीण, आदिवासी भागात शिक्षण पोहोचणे गरजेचे आहे हे लक्षात आले. त्यासाठी काहीतरी सुरू करावे हा विचार त्यांना सतत येत होता. त्यांनी त्यासाठी निवडणुकीत उभे राहायचे ठरवले. पण तिथल्या पक्षाने त्यांना मागे ओढले.

अनेक अडचणी येऊनही राजूंनी हार मानली नाही आणि एकलव्यची स्थापना केली. प्रत्यक्ष काम सुरू केले. अनेक तरुणांना मार्ग दाखवला. राजू केंद्रेंची ही तळमळ पाहूनच फोर्ब्सच्या सामाजिक कार्य उद्यमशीलता या कॅटेगरीमध्ये भारतातील तिशीच्या आतील तीस 'प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या' यादीत त्यांची निवड झाली.

२८ वर्षीय राजूंचे बुलढाण्यात आता बॅनर लागले आहेत. ज्यांनी त्यांना राजकारणात यायला मज्जाव केला, त्यांनी आता राजूच्या आईवडिलांचा सत्कार करायचे ठरवले आहे. राजू सध्या ब्रिटिश सरकारच्या चेवनिंग स्कॉलरशिपवर लंडनमध्ये उच्चशिक्षण घेत आहेत. पुढचे शिक्षण घेऊन हे कार्य पुढे न्यायचा त्यांचा निर्धार आहे. राजूंसारख्या तरुणांचे कौतुक झालेच पाहिजे. त्यामुळे अनेकांना प्रोत्साहन मिळेल.
शीतल दरंदळे

 

सबस्क्राईब करा

* indicates required