computer

भाग २ : अखेर देशद्रोही रबिंदरसिंगला नियतीने धडा कसा शिकवला ??...एका फितूर RAW एजंटची कहाणी !!

भाग १ : अखेर देशद्रोही रबिंदरसिंगला नियतीने धडा कसा शिकवला ??...एका फितूर RAW एजंटची कहाणी !!

या भागात आपण पाहूयात रबिंदरसिंगच्या देशविरोधी कारवाया कोणाच्या लक्षात कशा आल्या नाहीत ?

रबिंदरसिंगच्या संशयास्पद हालचाली “काउंटर इंटेलिजन्स”च्या लक्षात कधीच आल्या होत्या. त्यांनी रबिंदरसिंगचे सगळे फोन टॅप केलेले होते. त्यावरून त्याच्यावरची निगराणी (सर्व्हेलंस) सुरु होता. गृहखात्याकडे त्याची माहिती वेळीच दिली गेली होती. परंतू सरकारी दिरंगाईत या गंभीर मामल्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही. त्यावेळचे सचिव ‘ब्रिजेश मिश्र’ यांनी अटकेचे फर्मान फारच उशिरा काढले आणि रबिंदरसिंगला या हालचालींची चाहूल लागली. उरलेल्या सर्व फायली सोबत घेऊन आपल्या बायको सोबत तो नेपाळला पळून गेला.

कसा पळून गेला तो देशाबाहेर ?

(काठमांडू )

काठमांडू मध्ये त्याला अमेरिकन अधिकाऱ्याने एका हॉटेल मध्ये चार दिवस लपवून ठेवले. आणि तोपर्यंत नव्या नावासोबत नवीन पासपोर्ट रबिंदरसिंगला देण्यात आले. ही माहिती कदाचित उघडकीस आलीच नसती पण एक घोडचूक CIA च्या अधिकाऱ्याने अशी केली की हॉटेलचे बुकिंग रबिंदरसिंगच्या नावानेच त्याने केले. जर गृह्खात्यातून तेव्हा वेळीच वॉरंट निघाले असते तर कदाचित तो रंगेहात पकडला गेला असता.

नियतीने त्याला कसा धडा शिकवला ?

(CIA मुख्यालय)

रबिंदरसिंग अमेरिकेत पोहोचला खरा पण त्यानंतर CIA ने त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. त्यांच्या दृष्टीने रबिंदरसिंगचा उपयोग संपला होता. मूर्ख रबिंदरसिंगला CIA चा हलकटपणा तेव्हा कळला जेव्हा त्याने अमेरिकेत राजकीय आश्रय (पॉलिटिकल असायलम) देण्यास स्पष्ट नकार दिला. जर अमेरिकेने पॉलिटिकल असायलम दिला असता तर अमेरिकेची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली असती.

तर मग रबिंदरसिंग अमेरिकेत कसा राहिला ?

सर्व प्रथम रबिंदरसिंगने नातेवाईकांसोबत संपर्क करून भारत सरकार तर्फे माझ्या जीवाला धोका आहे असा प्रचार केला आणि त्यांची सहानुभूती मिळवली. त्यानंतर असा तर्क केला जातो की त्याला अमेरिकेने नवी ओळख (Identity) देऊन त्याचे पुनर्वसन केले. सोबत CIA ने त्याच्याशी सर्व संपर्क तोडून त्याला पैसे देणंही बंद केलं. यानंतर मात्र रबिंदरसिंग एकाकी पडला. नातेवाईकांनी त्याच्याशी सर्व संपर्क तोडले. एकट्या पडलेल्या रबिंदरसिंगने उरलेले सर्व आयुष्य एखाद्या गुन्हेगारासारखे मान खाली घालून अमेरिकेत काढले. २०१६ च्या दरम्यान कधीतरी त्याचा एका कार अपघातात मृत्यू झाला.

यादरम्यान भारतात काय घडत होते ?

संसदेत या प्रकरणावर बराच गदारोळ झाला. पण अमेरिकेतून रबिंदरसिंगला पकडून आणण्यात आपल्या सरकारला अपयश आले. आणि २००७ साली हे प्रयत्न थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक देशातील RAW च्या अधिकाऱ्यांना रातोरात त्या त्या देशातून बाहेर पडावे लागले. थोडक्यात RAW चे अंतरराष्ट्रीय नेटवर्क उध्वस्त झाले. असे नेटवर्क अनेक वर्षांच्या मेहनतीने तयार होते, जे या दगलबाजामुळे एका रात्रीत संपले.

 

इतिहासात दगलबाजांना नियतीच धडा शिकवते असे अनेकवेळा घडले आहे. रबिंदरसिंग हा त्याचा एक नमुना. येत्या काही दिवसात RAW च्या कर्तबगारीच्या अनेक कथा आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. 

 

आणखी वाचा :

'RAW' बद्दल माहिती असाव्यात अश्या २० गोष्टी !!

या दोन प्रसंगांत पाकिस्तानने भारतासमोर हार मानली...आयएसआय प्रमुखांनी केलं कबूल !!

पाकिस्तानात भारतीय हेर का मारले गेले? मोरारजी देसाईंनी खरंच RAWला धोका दिला होता का??

सबस्क्राईब करा

* indicates required