अदृष्य आशीर्वादाच्या असंख्य ढाली ! बोभाटा स्पेशल !!

 'त्या' दिवशी असे काही होणार याची कल्पना कुणालाच नव्हती पण सूचक असे काही त्या दिवशी घडले त्याची इनसाईड स्टोरी श्री अनिकेत जोशी यांच्या सौजन्यांने !!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या याच कालपरवाच्या लातूर दौऱ्यात आणखी एक प्रसंग झाल्याचे नंतर बाहेर आले व तोही मोठा लक्षणीय आहे. स्वतःच्या बलवत्तर दैवावर किंवा हवे तर आपल्या प्रचंड सकारात्मक ऊर्जेवर म्हणा, मुख्यमंत्र्यांचा कसा ठाम विश्वास आहे हेही त्यातून दिसते. ते लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. निलंगा तालुक्यातील हलगरा या गावांत लोकसहभागातून करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेखाली झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा होता.

“त्या दिवशी, गुरुवारी, सकाळी अगदी लौकर त्यांचा दिवस सुरु झाला. उठल्या उठल्या ते  हलगरा येथे पोचले. सर्वप्रथम त्यांनी श्रमदान केले. मुख्यमंत्र्यांनी आल्यावर लगेचच हातात फावडे आणि टोपले घेऊन श्रमदानाला सुरूवात केली. केवळ हातात फावडे घेऊन फोटोपुरते श्रमदान न करता मुख्यमंत्री महोदयांनी तब्बल 20 ते 25 मिनिटे श्रमदान केले. मुख्यमंत्री महोदयांनी फावड्याने 1 ते 2 फुट खोदले आणि निघालेली माती स्वत: उचलून बांधावर टाकली. श्रमपरीहारा नंतर मुख्यमंत्री महोदय गांवकऱ्यांसोबत बाजेवर बसून गरम गरम न्याहरीचा आस्वाद घेणार होते. दरम्यान मुख्यमंत्री महोदयांनी गांवकऱ्यां सोबत एका झाडाखाली संवाद साधला. त्यांनी गांवकऱ्यांच्या भावना अगदी तळमळीने जाणून घेतल्या.  मुख्यमंत्री स्वत: मार्गदर्शनासाठी उभे राहिले आणि गांवकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. 
मुख्यमंत्री ज्या आंब्याच्या झाडाखाली उभे राहून उपस्थितांशी संवाद साधत होते, अगदी त्याच ठिकाणी त्यांच्या डोक्यावर एक तुटलेली फांदी कुठल्याही वेळी पडेल अशा अवस्थेत होती.  त्या फांदीकडे एका ग्रामस्थाचे लक्ष गेले आणि ते मुख्यमंत्र्यांना म्हणाले ‘आपण थोडे बाजूला उभे रहा, आपल्या डोक्यावरची फांदी तुटीलेली आहे ती आपल्या डोक्यावर पडेल’ त्यावर  मुख्यमंत्री जागेवरुन थोडेसे बाजूला हेात म्हणाले  ‘ घाबरु नका, मला काही होणार नाही. तुमच्या सारख्या अनेकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असतांना मला काही होणार नाही’ त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण सुरूच ठेवले आणि आपले महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न लोकांपुढे मांडत राहिले. 
संवाद संपताच मुख्यमंत्री बाजेवर बसले. बसतांना माझ्या शेजारी बसलेले एक पत्रकार मुख्यमंत्र्यांना म्हणाले ‘ मुख्यमंत्री महोदय थोडे सरकून बसा....वर अडकलेली झाडाची फांदी अंगावर पडेल’ तेव्हा  मुख्यमंत्री म्हणाले ‘  मला काही होणार नाही, आशीर्वादाच्या असंख्य अदृष्य ढाली माझ्या पाठीशी आहेत’. खरंच या वाक्याचा प्रत्यय काही वेळातच आला. मुख्यमंत्री महोदयांचे हेलिकॉप्टर कोसळले. मात्र मुख्यमंत्री महोदयांना थोडीही इजा झाली नाही. कारण ‘आशीर्वादाच्या असंख्य अदृष्य ढाली त्यांच्या पाठीशी आहेत’ याचा प्रत्यय आला.” लातूरचे जिल्हा माहिती अदिकारी मुकुंद  चिलवंत, यांनी हा सारा प्रसंग नोंदला हे. हेलिकॉप्टर अपघातानंतर त्या प्रसंगाचे महत्वा अर्थातच अधिकच अधोरेखित झाले !!

सबस्क्राईब करा

* indicates required