त्या ११ जुलैच्या दिवशी नेमकं काय घडलं ? वाचा स्कायलॅब ची कहाणी.

तुम्हांला आठवत असेल,  ऐंशीच्या दशकात  स्कायलॅब हे अंतराळस्थानक कोसळणार होतं, तेव्हाही देशभरात अनेकांची जबरदस्त  घाबरगुंडी उडाली होती. त्या गमतीदार आठवणी यानिमित्ताने ताज्या झाल्यात.  सध्या मात्र इंटरनेटच्या महाजालातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक घटनेबाबत सर्व बाजूंची माहिती मिळत असते. त्यामुळं सर्व पैलू लक्षात येतात. साहजिकच कुठल्याही घटनेबाबत वाटणारी  भीती खूपच कमी झालीय. पण, पस्तीस वर्षांपूर्वीचा काळ खूप निराळा होता. स्कायलॅब कोसळणार.. या बातमीनं तेव्हा भल्याभल्यांची झोप उडाली होती. त्या दिवसांतील थरार, देशभर पसरलेला भयगंड आठवून आजही अनेकांच्या अंगावर शहारे उभे राहतात.

काय होती ही स्कायलॅब आणि ती का पडणार होती?

 


 स्कायलॅब ही अमेरिकेची अंतराळ प्रयोगशाळा. अमेरिकेने १९७३ मध्ये  यानाच्या स्वरुपात ती अवकाशात सोडली होती. सौरचक्रानुसार सूर्याची सक्रियता नेमकी किती वाढेल, याचा अमेरिकन  संशोधकांचा अंदाज बहुदा चुकला. सूर्याच्या वाढत्या सक्रीयतेमुळं पृथ्वीभोवतीचं वातावरण प्रसरण पावलं. त्याचा परिणाम साडेचारशे किलोमीटर उंचीवरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालणाऱ्या स्कायलॅबच्या कक्षेवर झाला. परिणामी, ती  कोसळण्याचा धोका निर्माण झाला. एकंदर खगोलीय गणितं लक्षात घेता स्कायलॅब भारतात पडणार असं चित्र होतं. अमेरिकेने तशी घोषणा केल्याचं वृत्त १९७९ च्या जुलै महिन्यात येऊन थडकलं अन् देशात एकच खळबळ उडाली. देशभरातील जनतेची पाचावर धारण बसली.

नक्की काय झालं होतं?


स्कायलॅबचं वजन किती? क्षमता किती? ती नेमकी कुठं पडू शकेल? त्यामुळं किती संहार होईल? अशा निरनिराळ्या मुद्द्यांवर तर्कवितर्क सुरू झाले. उलटसुलट चर्चा झडू लागल्या. अफवांचं पेव फुटलं. सगळीकडं कमालीचं भीतीचं वातावरण पसरलं.  स्कायलॅबचं संकट टाळण्यासाठी लोक ईश्वराचा धावा करू लागले. मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारांमध्ये गर्दी वाढली. तीर्थक्षेत्रं भाविकांनी ओसंडून वाहू लागली. जगायचे थोडेच् दिवस उरलेत या भावनेनं अनेकांनी हाय खाल्ली. कित्येकजण अपुऱ्या इच्छा पूर्ण करायला धडपडू लागले. कापडाचोपडाची खरेदी करू लागले कर्ज काढून मुलाबाळांना खाऊपिऊ घालू लागले. हवी ती चैन करू लागले. काहींनी नातेवाईकांसोबत पार्ट्यांचे प्लान्स आखले. ग्रामीण भागात गावजेवणाच्या पंगती उठू  लागल्या. भोजनाला जोडून कीर्तन, प्रवचनाला कार्यक्रम असायचा. गावकीत, भावकीत  झालेली भांडणं विसरून लोक एकमेकांच्या घरी मांडीला मांडी लावून जेवू लागले. अर्थात, हे सारं करण्यामागं दुःखाची किनार आणि निराशेची छाया होती.  आजूबाजूच्या  जगात सगळं वातावरण वेगळं असलं तरी काही शाळांत मात्र नेहमीप्रमाणं अभ्यास सुरू होता. शिक्षकही वातावरण हलकं ठेवायचा प्रयत्न करीत होते. मुलांना धीर देत होते. कॉलेज, बँका, सरकारी कार्यालयं, खासगी ऑफिसेस, पानाच्या टपऱ्या सगळीकडं चर्चेचा हाच एकमेव विषय असायचा. सगळं वातावरण स्कायलॅबमय झालं होतं..आणि त्यातच ११ जुलैला स्कायलॅब कोसळणार असं वृत्त येऊन थडकलं अन् लोकांच्या काळजाचा ठोका चुकला.

स्कायलॅब कोसळणार म्हणून लोकांची प्रतिक्रिया काय होती?


     जसजसा ११  जुलैचा दिवस जवळ येऊ लागला, तसतशी भीतीची छाया गडद व्हायला लागली. वातावरण संवेदनशील झालं. लोक भावूक होत गेले, मनं कातर झाली. अगदी वाघाच्या काळजाच्या माणसांचीही मनं सशासारखी होत गेली. देवाचा धावा सुरू झाला. आदल्या दिवशी अनेकांनी देव पाण्यात घातले. कसाबसा तो दिवस उजाडला. सकाळपासून वातावरण कुंद होतं. नेमकं काय होणार? कसं घडणार? या भावनेनं लोकांचे चेहरे कोमजले. शहरांतली वाहतूक मंदावली. दुपारनंतर पार शुकशुकाट झाला. शाळा, कॉलेजं  सोडून देण्यात आली. सरकारी, खासगी कार्यालयांनाही दुपारनंतर सुट्टी दिली गेली. रस्ते निर्मनुष्य झाले. दिवस सरू लागला तशी धाकधूक वाढत गेली. दुपार सरुन तिन्ही सांजा झाल्या तरी काही घडलं नव्हतं. सूर्य मावळतीकडं झुकला. लोकांचा धीर सुटू लागला. स्कायलॅबचं काय झालं? ती कधी पडणार? संकट टळलं की लांबलं? नाना शंका कुशंका मनात येऊ लागल्या. उत्सुकता वाढली, उत्कंठा  शिगेला पोचली. संध्याकाळ झाली तसं दिव्याला नमस्कार करून लोकांनी घरादारातल्या बल्ब, ट्युबा लावल्या. सगळ्यांचं लक्ष रेडिओवरच्या संध्याकाळच्या बातम्यांकडं लागलं. घराघरात, गावच्या पारांवर, देवळांमध्ये, दुकानांमध्ये लोक रेडिओ, ट्रान्झिस्टरभोवती जमले. एकदाचे सात वाजले. बातम्यांची घोषणा झाली.
"नमस्कार, आकाशवाणी पुणे.." म्हणून निवेदकाचा आवाज घुमला. कानात प्राण आणून लोक ऐकू लागले. "स्कायलॅब ही अमेरिकेची बहुचर्चित अंतराळ प्रयोगशाळा आज ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटी प्रदेशात कोसळली. कोणतीही जिवीत हानी झाली नाही. भारतावरील मोठे संकट टळले..." पुढच्या काही बातम्या ऐकण्यापूर्वीच लोकांनी एकच जल्लोष केला. एकमेकांना मिठ्या मारल्या. साखर, पेढे भरवले. डोळे भरून आले. अनेकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूच्या धारा वाहू लागल्या.  महिनाभरापासून लक्षावधी लोकांच्या मनावर असलेलं भीतीचं, ताणाचं, तणावाचं ओझं त्यात वाहून गेलं.

(आबिद शेख, पुणे)
(88806706466)

सबस्क्राईब करा

* indicates required