नैसर्गिक आपत्तीला 'प्रेमाचा प्रलय' घोषित करणाऱ्या 'केदारनाथ'चा ट्रेलर बघितला का राव ?
मंडळी, बॉलीवूड आपल्या प्रेम कहाण्यांमधून बाहेर पडण्याची काही लक्षणं दिसत नाहीये. दर १० मधल्या निदान अर्ध्या तरी सिनेमांची कथा ‘प्रेम’ या एकाच भावनेभोवती फिरते. नुकताच आलेला ‘केदारनाथ’ हा सिनेमाही याला अपवाद नाही.
२०१३ साली उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश भागात जो भयानक पाऊस पडला त्याच्या अवतीभवती फिरणारी केदारनाथची कथा आहे. पण या नैसर्गिक आपत्तीला दिग्दर्शक अभिषेक कपूरने ‘प्रेमाचा प्रलय’ असं काहीसं रूप दिलंय.
मुस्लीम मुलगा आणि हिंदू मुलीचं प्रेम प्रकरण असतं. त्यांच्या घरचे अर्थातच विरोध करतात. मग हा जालीम समाज दोघांना वेगळं करतो. मुलगी रडते आणि तिचा शाप सगळ्या समाजाला लागतो. याचा परिणाम म्हणजे भरपूर पाऊस आणि प्रलय. कथा ओळखीची वाटते का ? ‘सत्यम शिवम सुंदरम’च्या शेवटी असंच काहीसं घडतं. हो ना ? प्रेमी युगुलाच्या मध्ये येणारा जालीम समाज ही गोष्टही आपण अनेक सिनेमांमध्ये पाहिलेली आहे. केदारनाथ मध्ये याला हिंदू-मुसलमान असा रंग देण्यात आला आहे. पण तोही आता उगाळून जुना झालाय.
केदारनाथ चित्रपटातून सैफ आली खानची मुलगी सारा आली खान फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. ट्रेलर मधून तरी तिच्याकडून फारशी आशा बाळगण्यात अर्थ नाही असंच दिसत आहे. तिच्या जोडीला सुशांत सिंग राजपूत आहे. तो नेहमी वावरतो तसा ‘हिरो’ सारखाच वावरतोय. मुळात स्क्रिप्ट कमकुवत असल्यावर कलाकार कितीही गुणी असला तरी फारशी जादू दाखवू शकत नाही. दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या पूर्वीच्या सिनेमांपेक्षा हा अगदीच कमकुवत सिनेमा म्हणावा लागेल.
मंडळी, शेवटी एवढंच वाटतं बॉलीवूडने आपल्या ‘प्रेम’ प्रकरणांना सोडचिठ्ठी देऊन चांगले आशय असलेले चित्रपट तयार करावेत. त्यामानाने मराठीत अनेक पटीने चांगलं काम होताना दिसत आहे.
चला तर मंडळी तुम्ही सुद्धा ‘केदारनाथ’चा ट्रेलर पाहून घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका !!