बाजारात आंबा खरेदीला जात आहात? मग हे वाचाच

चिरंजीव, बायकोच्या हातात पाळण्याची दोरी दिल्यावर तुमच्या हातात बाजारहाटाची पिशवी येणे हा निसर्गक्रमच आहे. असो. आता  एकेक प्रश्न आपण अग्रक्र्माने घेण्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी सांगणे अत्यावश्यक आहे. बर्‍याच वर्षानी तुम्ही आम्हाला काहीतरी विचारताय याचा आनंद आहेच पण त्याहूनही आनंद तुम्ही आमच्या पिशवी पंथात सामील झाल्याचा आहे. तर पुन्हा एकदा असो.

स्रोत

चांगला हापूस कुठे मिळतो :  शाकाहारी बहुल वस्ती असलेल्या बाजारात  म्हणजे मुंबईत घाटकोपर-मुलुंड -सायन -विलेपार्ले भागात हापूस चांगला मिळतो. एपीएमसी बाजारात जाण्याचा अतिउत्साह करण्याची ही वेळ नाही . तुम्हाला दोघांना आणि आल्या गेल्या एखाद्या पाहुण्याला हिशेबात धरून आठवड्याला एखादा डझन आंबा पुरेसा आहे.  तुमच्या उपनगरातल्या  बाजाराचे पण पोटभाग आहेत. सायनला आंबा चांगला मिळत असेल पण तेगबहादूर नगर म्हणजे जुन्या  कोळीवाड्यात आंबा चांगला मिळणार नाही. पार्ल्याच्या पूर्व भागात हापूस  उत्तम मिळेल पण जूहू स्किममध्ये  तोच हापूस दामदुपटीने महाग मिळेल. मुलुंड पश्चिमेला  उत्तर प्रदेशी लोकांची गर्दी असलेल्या बाजारात आंबा घेण्यापेक्षा पूर्वेला पोंक्षे-फडके -नित्सुरे अशी आडनावे असणार्‍या दुकानदाराकडे आंबा घेणे फारच श्रेयस्कर. हे दुकानदार ग्राहकाशी कडवट -कुत्सित आवाजात बोलतात पण त्यांच्याकडे  आंबा उत्तम मिळतो. भय्ये लोकांकडे आंबा चांगला आंबा मिळत नाही असे नाही पण ते व्यापार करत असतात त्यामुळे त्यांच्याकडच्या  डझनातल्या बारा पैकी आठ हापूस तर चार हापूससारखे आंबे असतात. हापूस आणि हापूससारखा ह्या दोन्हीतल फरक काय ह्या प्रश्नाचे उत्तर  बायको आणि बायकोसारखी म्हणजे काय अशा प्रतिप्रश्नाने द्यावे लागते.

स्रोत

हापूस देवगडचा की रत्नागिरीचा ? :  देवगडचा हापूस म्हणजे जुना रत्नागिरीचाच हापूस. जिल्हे-बदल आपण केले आहेत आंब्यांनी नाही. तरी पण सामन्यज्ञानासाठी म्हणून सांगतो. हापूसची चव ही माती आणि पाण्याप्रमाणे बदलते. तांबड्या कातळावर वाढवलेली खार्‍या वार्‍याला दिवसरात्र तोंड देणार्‍या कलमाची फळे चवीला उत्तम असतात. डोंगराच्या उतारवरची कलमे पण चांगली फळे देतात पण त्यांची साल जरा निबर असते. म्हणजे मी राजापूरचा आणि तुमच्या मातोश्री विजयदुर्गच्या असा विचार केला तर फरक लक्षात तातडीने येणार. असो. असो. दोन्हीची चव चांगलीच असते.

खरेदीची ओपनींग मूव्ह कशी करावी? : कितीही ज्ञानामृताचे पेले प्याले तरी चतुर दुकानदार नवख्या नवर्‍यांना चांगलेच ओळखतात. तरीपण एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात आमच्याकडे माणगांव किंवा रोह्याचं उत्तम फळ आलंय ते देतो असे म्हणणारा दुकानदार तद्दन खोटारडा असतो. आंबा दक्षिणेकडून उत्तरेकडे पिकत जातो . आधी रत्नागिरी नंतर रायगड आणि सगळ्यात शेवटी वलसाड -गुजरात. चिपळूणचा आंबा मे महिन्याच्या पहिल्या हप्त्यात-रोहा अलिबाग  त्यापाठोपाठ आणि बाकी सगळे आल्सो रॅन मधले...


केमिकलवाला आंबा कसा ओळ्खायचा? : आंबा व्यापार्‍यावर इंप्रेशन मारण्यासाठी कार्बाईड आणि कलटार ,हथ्था हे शब्द वापरणे म्हणजे लिंक्ड-इन प्रोफाईलच्या जोरावर  नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघण्यासारखे आहे. व्यापार्‍याला हे सगळे ऐकवणारी चाळीस माणसं दिवसभरात भेटतात.   एकतर आता कार्बाईड कोणी वापरत नाही. हथ्थ्याचा संबंध आंब्याशी नसून फक्त सौद्याशी आहे हे आपल्याला कळत नाही आणि कलटार हे ब्रँड नेम आहे हे कलटार म्हणणार्‍या ग्राहकाला माहीती नाही हे त्या (धूर्त) व्यापार्‍याला पक्के माहिती असते. तस्मात काहीही सोंग न घेता डझनभर आंबे घ्यावे आणि घरी यावे. 

स्रोत

एकदम पाच डझनाची पेटी घ्यायची का? : पाच डझनाची पेटी घेणे हा अव्यापारेषु व्यापार आहे. आंब्याचा भाव बाजारात आल्या दिवसापासून उतरतच असतो. म्हणजे उतरत्या भावाच फायदा पाच आठवडे विसरायचा . हे पाच आठवडे संपता संपता उत्साहच संपला असतो. त्याखेरीज पेटी उघडा , गवत अंथरा , आंबे मांडून ठेवा त्यांच्यावर गस्त घाला अशी कामे वाढतात हे वेगळेच.


हे सगळं ऐकल्यावर चिरंजीव तुमच्या लक्षात आलं असेलच की पिशवी संप्रदायाची रिकामी पिशवी पण वजन दार असते. मग लोकोत्तर पुरुषाने करायचे तरी काय असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर मी मोजकी पाच लक्षणे सांगतो ती लक्षात ठेवा,.
१. हापूस आकाराच्या मानाने वजनदार असावा. कलटार प्राशन केलेल्या झाडाचा आंबा हलका लागतो.
२. आंब्याच्या पोटात पिकण्याची क्रिया चालू असते ,त्यामुळे आंबा हातात धरला की उबदार लागतो. 
३. नाकावर आपटलेला आंबा घेऊ नये किंवा गोलाकार आंबा घेऊ नये.
४. नाकाजवळ नेऊन सुगंध घेतला तर तो एक सारखा यावा . त्यात उग्र अशी सेकंड नोट आली तर आंबा नि:संशय कमअस्सल आहे असे समजावे. पण हे तंत्र जमेपर्यंत दुसरा पाळणा घरात हलण्याइतका कालावधी जातो.
५. आंब्याच्या देठाचे निरीक्षण करावे. देठाजवळ पांढर्री बुरशी दिसली किंवा बारीक छिद्रे दिसली तर आंबा जागच्या जागी ठेवून दुकानातुन बाहेर पडावे. 

शेवटी आंबा बघावा देठात हेच खरे..

सबस्क्राईब करा

* indicates required