computer

४२०? हा १५०कोटींची उलाढाल करणारा ब्रँड नक्की कशाचा आहे?

४२० आकडा बघितल्यावर चोर, लफंगा, फसवणारा, ठग, अशाच गोष्टी आठवतात. म्हणजे पाहा ना, कायद्यातली इतर कलमं आपल्याला माहित नसतील, पण ४२० हे कोणतं कलम आहे हे सगळ्यांना माहित असतं.  त्यावरूनच 'श्री ४२०’ नावाचा राज कपूरचा सिनेमा आला होता  आणि त्यात राज कपूरची भूमिका चोराचीच होती. तर, एकंदरीत ४२० आकडा हा काही चांगल्या अर्थाने विचारात घेतला जात नाही, पण एका माणसाने हाच आकडा घेऊन आपल्या व्यवसायाला नवीन उंची मिळवून दिली आहे.

आज आम्ही हुकूमचंद अग्रवाल यांची गोष्ट सांगणार आहोत. हुकूमचंद हे सुरुवातीच्या काळात आपल्या घरात पापड तयार करायचे आणि ते बाजारात विकायचे. आपल्या पापड ब्रँडसाठी त्यांनी चक्क ४२० नाव घेतलं होतं. नावात घपला असला तरी पापड मात्र अव्वल होते. म्हणूनच पाहता पाहता संपूर्ण मध्यप्रदेशमध्ये ४२० पापडची जोरदार विक्री सुरु झाली.

(हुकूमचंद अग्रवाल)

आज ४२० पापड हा ब्रँड तयार झाला आहे. या ब्रँडच्या अंतर्गत फक्त पापड विकले जात नाहीत, तर त्यासोबत वेगवेगळी उत्पादनंही विकली जात आहेत. खट्टा-मीठा चना पापड, पंजाबी पापड, कतरन, खमण मिक्स, इडली मिक्स, मूंग भजिया मिक्स, गुलाबजामुन मिक्स आणि चौकोर पापड अशा बऱ्याच गोष्टी या ४२० ब्रँडच्या अंतर्गत विकल्या जातात. 

सध्या ४२० ब्रँडचं जाळं भारतातल्या २० राज्यांत पसरलं आहे. भारतभर एकूण ४५० डिस्ट्रीब्यूटर ४२० ब्रँडसाठी काम करतात. ही यशोगाथा इथेच थांबत नाही. सध्या ४२० ब्रँडने मध्यप्रदेश आणि भारताच्याही सीमा ओलांडून अमेरिकेपर्यंत उडी घेतली आहे. कंपनीची एकूण  वार्षिक कमाई तब्बल १५० कोटी रुपये एवढी आहे.

तर मंडळी, ज्या आकड्यापासून सगळे दूर पळतात त्याच आकड्याला घेऊन हुकूमचंद अग्रवाल यांनी शिखर गाठलं आहे. नवीन व्यावसायिकांना यातून नक्कीच धडा मिळेल. काय म्हणता?

सबस्क्राईब करा

* indicates required