computer

२०११ च्या भयंकर त्सुनामीनंतर जपान कसं उभं राहिलं...जपानच्या जिद्दीची साक्ष देणारे फोटो पाहा !!

बरोबर दहा वर्षांपूर्वी जपानमध्ये आलेला भूकंप आणि त्यांनतर आलेला त्सुनामी आठवतेय? २०११ मध्ये आलेला ९ रिश्टर क्षमतेचा भूकंप आणि त्यानंतर आ;ली ती त्सुनामी. ११ मार्च रोजी दुपारी ३ वाजता हा जबरदस्त भूकंप आला आणि किनारपट्टीवर ४० मीटर उंचीच्या अक्राळविक्राळ लाटा उसळल्या. त्या लाटा इतक्या मोठ्या होत्या की जवळच्या शहरांवर त्याचा जोरदार तडाखा बसला. त्यात जवळजवळ सर्व उध्वस्त झाले, पण आता तेच जपान जिद्दीने पुन्हा वसलेय. नुकतेच त्याचे फोटो पोस्ट केले गेले आणि व्हायरल झाले. नेटकऱ्यांनी जपानच्या जिद्दीचे कौतुक केले.

त्या त्सुनामीमुळे १६००० लोकांचा जीव गेला होता. बेपत्ता झालेले जवळजवळ २००० लोक पुन्हा सापडलेच नाहीत. क्षणात होत्याचं नव्हतं म्हणजे काय हे तेव्हा जपानने अनुभवलं. नैसर्गिक संकटासमोर माणूस पूर्णपणे हतबल होतो. त्या लाटांनी अनेक शहरांना अक्षरशः गिळले. मिनामिसानरिकू, इशिनोमाकी व लिटेट या तीन शहरांची परिस्थिती तर इतकी वाईट होती की नकाशावरून ते नष्ट होतात की काय असे वाटत होते.

इशिनोमाकी शहर हे ५० किमी दक्षिण बाजूला किनारपट्टीवरील आहे. २०११ च्या आपत्तीत हे शहर उद्ध्वस्त झाले होते. रस्त्यांचे नुकसान झाले होते. हे सर्वात मोठे शहर आहे. पूल वाहून गेले होते. किताकामी नदीने शहराला उद्ध्वस्त केले होते. पाणी शहरातील अरुंद गल्लीबोळात शिरले होते. लाकडाची पारंपरिक घरे वाहून गेली होती. नवीन घराचा पायाही उद्ध्वस्त झालेला होता. नदीच्या लाटांनी ढिगाऱ्यांसोबत बोट, गाड्या, खांब वाहून नेले होते. अनेक लोकं वाहून गेली. मिनामिसानरिकू व लिटेट शहरही या जबरदस्त तडाख्यातून वाचू शकले नाही. सुनामी धडकली तेव्हा ताशी ७०० किमी वेगाने आलेल्या लाटांनी मार्गात आलेल्या प्रत्येक गोष्टीला स्वतः सोबत वाहून नेले.

जपानला भूकंप तसे नवीन नाहीत. जपानने १०० वर्षांत ४०० पेक्षा जास्त भूकंप पाहिले होते. पण २०११ च्या त्सुनामीमुळे खूप जीवितहानी झाली. पण या नैसर्गिक तडाख्यानंतरही हे शहर पुन्हा उभे राहिले आहे. नवीन वसवण्यात आलेले शहर आता अधिक उंचीवर बांधण्यात आलेले आहे. जिथे त्सुनामीचा कमीत कमी धोका असेल. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे तीन वर्षांत आधी एक कृत्रिम किनारपट्टी सुरू करण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले रुग्णालय उद्ध्वस्त झाले होते. त्याच जागी ३५०० कोटी रुपये खर्चून नवे रुग्णालय उभे राहिले आहे. अनेक रस्ते, दुकानं, मोठेमोठे मॉल्स, शाळा यांचे फक्त सांगाडे शिल्लक राहिले होते. ते आता नव्याने उभे राहत आहे. काही ठिकाणी अजूनही जमिनीचे सपाटीकरण चालू आहे. काँक्रीटच्या बंधाऱ्यांनी नद्यांवर नियंत्रण आणण्यात आले आहे.

जपान वेगाने उभे राहत आहे. अनेक जणांनी नव्या घरात जाताना जुन्या घराचे राहिलेले काही भाग आठवण म्हणून जवळ ठेवले आहेत. कितीही मोठी नैसर्गिक आपत्ती आली तरीही माणूस हार न मानता परत उभा राहतो. हीच कहाणी या फोटोतून दिसून येते.

 

 

लेखिका: शीतल दरंदळे

 

आणखी वाचा :

अणुबाँबमुळे बेचिराख झालेल्या हिरोशिमाने कशी भरारी घेतली याची गोष्ट?

सबस्क्राईब करा

* indicates required