जाणून घ्या... कैद्याला सूर्योदयापूर्वीच फाशी का दिली जाते ?
निर्भया प्रकरणातल्या क्रूर बलात्कार्यांना सर्वोच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली, तर नुकतंच कोपर्डी प्रकरणातील आरोपींनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. परत एकदा जिथंतिथं फाशीच्या शिक्षेचा विषय रंगू लागलाय मंडळी. पण तुम्हाला माहीतीये का? भारतात फाशी ही नेहमी सूर्योदयापूर्वीच का दिली जाते? काय कारणं आहेत यामागे? चला जाणून घेऊया यामागची कारणं...
प्रशासकीय कारण
तुरूंग प्रशासनासाठी फाशी देणं हे एक मोठं काम असतं. फाशीनंतरच्या वैद्यकीय चाचण्या, वेगवेगळ्या नोंदी, कैद्याच्या कुटुंबाकडं मृतदेह सोपवणं अशी अनेक कामं जेल प्रशासन करत असतं. त्यामुळे फाशी सूर्योदयापूर्वीच आटपून ही पुढची प्रक्रिया दिवसभर केली जाते.
नैतिक कारण
कैद्याला फाशीसाठी जास्त वेळ वाट बघायला लावणं हे त्याच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम घडवू शकतं. आता मृत्यू जवळ आलेला पाहून कोणाला बरं वाटेल मंडळी? त्यामुळे त्याला झोपेतून उठवून, नित्यकर्म उरकून लगेचच फाशी दिली जाते.
सामाजिक कारण
एखाद्याला फाशी देणं ही समाजासाठीही एक मोठी बाब असते. कधी कधी समाजातील विशिष्ट घटकांवर याचा वाईट परिणाम पडत असतो. त्यामुळे फाशीची शिक्षा पहाटेच दिली जाते. मिडीया आणि जनताही यावेळी नसते, त्यामुळं गोंधळ उडत नाही.
परिवारासाठी...
फाशीनंतर कैद्याच्या कूटुंबाकडून त्याचे अंतिम संस्कार केले जातात. त्यामुळे मृतदेह लवकरात लवकर कुटूंबाकडे सुपूर्द करून वेळेत अंतिम विधी आटोपता यावेत, हेही यामागचं एक कारण आहे.
ब्रिटिश कायदे
भारतातले बरेचसे कायदे ब्रिटिश राज्यघटनेला संदर्भ मानून तयार केले आणि ते अजूनही लागू आहेत. हा ही ब्रिटिश आमदानीतलाच कायदा आहे, ज्यात अजूनही बदल करण्यात आलेला नाही.




