computer

ढगफुटी आणि सामान्य पाऊस यात काय फरक असतो? या मागचं विज्ञान समजून घ्या!!

‘ये रे ये रे पावसा’ हे बडबडगीत तुम्हीही लहानपणी गायले असेल. पावसावर कविता केल्या असतील. पाऊस तुम्हालाही नक्कीच आवडत असेल, पण सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात या पावसाने जो काही हाहाकार मांडला आहे तो पाहून कुणालाही ‘जा रे जा रे पावसा’ म्हणायची वेळ आली आहे. हो ना? पाऊस सामान्य असेल तर तो हवाहवासाच वाटतो पण तोच पाऊस जेव्हा रुद्र रूप धरण करतो तेव्हा मात्र जीव नकोसा करून सोडतो. मुसळधार कोसळणाऱ्या पावसात आणि ढगफुटीत तसा मोठा फरक असतो. या ढगफुटीने यावर्षी महाराष्ट्रालाही वेठीस धरले आहे. ढगफुटी आणि सामान्य पाऊस यात काय फरक असतो? चला जाणून घेऊया.

(सामान्य पाऊस)

ढगफुटी होताना होणाऱ्या पर्जन्यवृष्टीचे प्रमाण खूप जास्त असते. काही मिनिटांत इतका मोठा पाऊस पडतो की त्या पावसाच्या माऱ्यापुढे मोठ्यातील मोठी वस्तूही मिनिटांत जमीनदोस्त होऊन जाते. कमी कालावधीत कमी क्षेत्रफळात होणारा मोठ्यातीलमोठा पाऊस म्हणजे ढगफुटी.

ढगफुटी ही फक्त वाळवंटात आणि पर्वतीय प्रदेशात होते. ढगफुटी होताना साधारणपणे एका तासात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. मोठ्या ढगांना जेंव्हा अचानक गरम वाऱ्याचा स्पर्श होतो तेव्हा ढगफुटी होते. एखादा पाण्याने भरलेला फुगा फुटावा अगदी तशाच पद्धतीने हे मोठमोठाले ढग फुटतात म्हणूनच या प्रक्रियेला ढगफुटी असे नाव देण्यात आले आहे.

आकाशातील ढगांना खालून आलेली गरम हवा ढकलत ढकलत वर नेते. ही हवा वरवर जात असताना ढगातून पडणारे हलके थेंबही स्वतःसोबत पुन्हा वर नेते. ढगामध्ये आधीच असणारे पाण्याचे थेंब खाली येत असतात, त्यात खालून येणाऱ्या गरम हवेमुळे हे थेंब पुन्हा ढगामध्ये ढकलेले जातात. आधीचे थेंब आणि नंतर खालून आलेले थेंब जमा होत होत ढगाचा आकार वाढत जातो. खालून वरती जाणाऱ्या हवेचा दाब जितका जास्त तितकी ढगफुटी होण्याची शक्यता जास्त. अक्राळविक्राळ ढगांना गरम हवेचा स्पर्श झाल्याने ढगांचे तापमान बदलते आणि तिथेच ढगफुटी होते. शॉवरमधून जसे एकाच दिशेने मोठमोठे पाण्याचे थेंब वेगाने खाली येतात अगदी तसेच ढगफुटी झाल्यावर पावसाचे थेंब सरळ रेषेत आणि तीव्रगतीने जमिनी वर पडतात. या थेंबांचा आकारही मोठा असतो. एकेका ढगामध्ये लाखो गॅलन लिटर पाणी साचलेले असते. हे लाखो लिटर पाणी अगदी काही तासांत पृथ्वीवर येऊन अक्षरश: आदळते.

(ढगफुटी)

सामान्य पाऊस पडतो तेव्हा पावसाचे थेंब आकाराने छोटे असतात आणि हा पाऊस काहीसा तिरका लागतो. शिवाय या पावसाने मोठा प्रदेश व्यापला जातो. आकाराने लहान असलेले कमी वेगाने येणारे हे थेंब जमिनीत मुरण्यास अवकाश मिळतो. ढगफुटी झाल्यावर पडणारे मोठमोठे पावसाचे थेंब जमिनीत न मुरता जमिनीची धूप घडवून आणतात आणि मातीसह हे पाणी वेगात वाहू लागते. असा पाऊस काही मिनिटे पडला तरी अशा पावसामुळे जमिनीची खूप मोठी हानी होते. मोठ्या प्रमाणात जमिनीवर आदळणारे हे पाणी वाट मिळेल तिकडे धावत सुटते. या पाण्याचे आकारमान आणि त्याचा वेगही मोठा असल्याने वाटेत येणारी वाहने, घरे, मोठमोठाली झाडे, यांच्यासह ते धावत सुटते. म्हणूनच ढगफुटीच्या पावसामुळे जलप्रलय आल्याचाच भास होतो.

मान्सूनचे ढग बंगालच्या खाडीवरून किंवा अरबी समुद्रावरून उत्तरेकडे प्रवास करत असताना अचानक हिमालयीन पर्वत रांगांना थडकतात आणि तिथे ढगफुटी घडून येते. हिमालयीन प्रदेशात ढगफुटी होण्याचे प्रकार खूपच सामान्य आहेत. कधीकधी ढग छोटे असतात, त्यामुळे त्यांची तितकीशी दाहकता जाणवत नाही. ढगांचा आकार आणि त्याचा कोसळण्याचा वेग यावर ढगफुटीच्या परिणामांची दाहकता अवलंबून असते. २०१३ साली उत्तराखंडमध्ये झालेली ढगफुटी ही आजवरची सर्वात मोठी ढगफुटी मानली जाते. या ढगफुटीवेळी सुमारे ५,४०० लोकांना जीव गमवावा लागला तर ४,२०० खेड्यांना याचा तडाखा बसला होता. त्याआधी २००६ साली मुंबईत झालेल्या पावसातही हीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील चिपळूण शहराला याचा तडाखा बसला आहे. चिपळूण शहराची दैन्यावस्था पाहिल्यास भल्याभल्यांची झोप उडेल आणि नको रे बाबा ही ढगफुटी अशी अवस्था होईल.

पर्जन्यवृष्टी किती प्रमाणात होईल याचा अंदाज वर्तवता येतो तसा ढगफुटीचा काही अंदाज वर्तवता येत नाही. अशा ढगफुटीने आता महाराष्ट्रालाही घेरले आहे.

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील पावसाने जे रौद्र रूप धारण केले आहे ते पाहून कोणाला बरे ‘ये रे ये रे पावसा’ म्हणावेसे वाटेल? तुम्हीच सांगा.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

 

आणखी वाचा:

पाऊस कसा मोजतात ? पाऊस का मोजतात ? चला जाणून घेऊ !!

सबस्क्राईब करा

* indicates required