अजय देवगण 'आधी लगीन कोंढाण्याचं' म्हणताना कसा वाटेल ?
बाजीराव मस्तानीसारखा मराठी बाजाचा सिनेमा हिंदीत तयार झाल्यानंतर आता अजय देवगण एक मोठं सरप्राईज घेऊन आलाय. तानाजी मालुसरे या मराठी वीराची गाथा आता तो भव्य पडद्यावर साकारणार आहे. यासाठी दिग्दर्शनाचा भार ‘लोकमान्य ‘एक युगपुरुष’ चे दिग्दर्शक ओम राऊत सांभाळणार आहेत. कालच सिनेमाचं पाहिलं पोस्टर रिलीज झालं. अजून चित्रीकरणाला प्रारंभ झालेला नाही. अजय देवगण आणि ओम राऊत यांनी सोशल मिडीयावर बातमी शेअर करून सर्वांना धक्काच दिला.
'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं' हे अजरामर वाक्य अजयच्या तोंडून ऐकताना भारी वाटेल.. पण काही प्रश्न मनात घोळत आहेत! पहिला प्रश्न तर हिंदीमध्ये मराठी बाजाचा सिनेमा करताना शब्दांची अनेकदा वाट लागते. तसेच इतिहास तितक्याच खरेपणाने सांगितला जाईल का ही सुद्धा शंका आहेच. बाजीराव मस्तानीतल्या ‘पिंगा’ गाण्याचंच उदाहरण घ्या नं!!
भव्य दिव्य सिनेमा साकारताना त्यातला अस्सलपणा कुठे तरी हरवेल का? ओम राऊतच्या मागच्या सिनेमात लोकमान्य टिळकांच्या भूमिकेला ‘लार्ज्जर दॅन लाईफ' करण्याच्या चक्कर मध्ये मूळ लोकमान्यांच्या कॅरेक्टरलाच धक्का लागल्याचं बोललं जातं. यावेळी तानाजी मालुसरे उभा करताना तो काय करतोय हे बघण्यासारखं असेल!!
तूर्तास २०१९ पर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे.