ओडीसातले लोक मुलांची नावं ‘तितली’ का ठेवत आहेत ?
मंडळी, अनेकजण आपल्या आवडत्या सेलिब्रिटीचं नाव किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचं नाव बाळाला ठेवतात. गावाकडे आजही काही नवजात बाळांची नावं हे आजी/आजोबांच्या किंवा पणजोबांच्या नावावरून ठेवली जातात. पण कधी नैसर्गिक आपत्तीचं नाव बाळाला ठेवल्याचं ऐकलंय का ? नाही ना ? राव, ओडीसा मध्ये हेच घडतंय. ओडीसा मधले लोक चक्क चक्रीवादळाचं नाव आपल्या मुलींना देत आहेत.
चला जाणून घेऊ या मागचं कारण !!
ओडीसा मध्ये सध्या "तितली" नावाचं चक्रीवादळ थैमान घालत आहे. केरळ मध्ये पुराने जे नुकसान केलं तेच या चक्रीवादळामुळे घडत आहे. या वादळाने लोकांना काय दिलं तर त्याचच नाव “तितली” !!!
गंजम, जगतसिंगपुर आणि नयागड भागातले लोक नवजात मुलीचं नाव ‘तितली’ ठेवत आहेत, कारण या मुली वादळाच्या पूर्वी किंवा वादळाच्या नंतर जन्माला आल्या. बुधवारच्या मध्यरात्री ‘तितली’ने थैमान घालायला सुरुवात केली. त्या दरम्यान जन्माला आलेल्या जवळजवळ ९ मुलींची नावं तितली ठेवण्यात आली आहेत.
राव, आणखी मुलींची नावं तितली पडू शकतात कारण एकट्या गंजम भागात बुधवारच्या रात्री जवळजवळ १०० मातांना प्रसूतीसाठी हॉस्पिटल मध्ये आणण्यात आलं होतं. त्यामधल्या ६४ स्त्रियांची प्रसूती झाली आहे.
मंडळी, अशी नावे ठेवणं तसं फार नवीन नाही. एप्रिल मध्ये एकाने मुलीचं नाव स्वच्छता ठेवलं होतं. आणखी एकाने मुलीचं नाव जीएसटी ठेवलं होतं. हे तर काहीच नाही भाऊ, लालूप्रसादनी पण "मिसा" कायद्याच्या नावावरून त्यांच्या मुलीचं नाव मिसा भारती ठेवलं होतं.
राव अशाच विचित्र नावांवरचा आमचा खालील लेक वाचायला विसरू नका.
अजब गजब गाव : या गावात गुगल, ओबामा, सोनिया गांधी, शाहरुख खान हे सगळे एकत्र राहतात !!