बोभाटा दिवाळी जत्रा : समरगडचा किल्ला !!
एकेकाळी दिवाळीत किल्ला बांधणे हा आपल्या लहानपणाचा एक अविभाज्य भाग होता. काही वर्ष किल्ल्यांच्या स्पर्धा पण झाल्या. आता मात्र दिवाळीतला किल्ला विस्मरणात जात असतानाच आमच्या शेजाऱ्यांचा ‘समर’ हातात किल्ल्याचं चित्र असलेलं पुस्तक घेऊन आला.
त्याचा पहिला प्रश्न होता, “हे काय आहे ?”.
उत्तर सोप्प होतं, “हा किल्ला आहे !”.
पुढचा प्रश्न “किल्ला म्हणजे काय ?”.
आमचं उत्तर म्हणजे, “हे घर आहे !!”.
पुढचा प्रश्न होता, “कोणाचा घर आहे ?”.
अर्थातच स्वाभाविक उत्तर होतं, “शिवाजी महाराजांचं !!”.
आता प्रश्न संपून मागण्या सुरु झाल्या, “मला पण पायजे किल्ला !!”.
समरला किल्ला पाहिजे म्हटल्या नंतर त्याचे बाबा आणि काका दोघेही त्याच्याच वयाचे झाले.
बरीच वर्ष शहरी मनात दडलेलं एक इच्छा उसळी मारून जागी झाली आणि सुरु झाली “किल्ले मोहीम”. आता पहिला प्रश्न होता ‘माती कुठून मिळणार ?’.
समरगडचे किल्लेदार
पेव्हर ब्लॉकच्या अंगणात माती मिळणार कशी ? थोडक्यात किल्ला बांधायचा तर रजा घेणे अपरिहार्य झालं. मग, नर्सरीतून माती, घरच्या कामातून उरलेले रंगांचे डबे, घोडबंदर रोडच्या खाडीवरून दगड आणि तिथल्याच ढिगाऱ्यातून सिमेंट ब्लॉक्सचे तुकडे मिळाले.
....आणि मग जमवाजमव पूर्ण झाल्यानंतर किल्ला बांधायला सुरुवात झाली
चार दिवसांनी महाराजांचा ‘समरगड’ तयार झाला !!
सौजन्य : शशांक गारखेडकर आणि स्वप्नील बागडे.