कथा अशा माणसाची ज्यानं स्वतःच्या बायकोचं लग्न तिच्या बॉयफ्रेंडसोबत लावून दिलं...
राव, कानपूर मध्ये एक अजब घटना घडली आहे. एका नवविवाहित तरुणाने आपल्या पत्नीचं लग्न तिच्या बॉयफ्रेंडबरोबर लावून दिलं. या घटनेनंतर त्या तरुणाचं कौतुक तर होतंय , पण नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली सुद्धा उडवली आहे.
तर झालं असं की, कानपूरच्या सुजितचं लग्न १९ फेब्रुवारी रोजी फतेहपुरच्या शांती नावाच्या मुलीशी झालं होतं. लग्नानंतर दोघांमध्ये संबंध नीट नव्हते. शांतीला याबद्दल सतत विचारल्यानंतर तिने मन मोकळं केलं.
खरंतर तिचं लग्न तिच्या मर्जीविरुद्ध करण्यात आलं होतं. तिचं रवी नावाच्या मुलावर प्रेम होतं. घरच्यांच्या दबावाखाली तिला सुजितबरोबर लग्न करावं लागलं होतं. पण लग्नानंतर ती पूर्णपणे त्याला विसरू शकली नव्हती.
हे सर्व समजल्यानंतर सुजितने धैर्याने निर्णय घेऊन शांती आणि रवीचं लग्न लावण्याचं ठरवलं.
त्यासाठी त्याने दोघांच्या कुटुंबियांना नीट समजावलं. सुरुवातीला कुटुंबियांकडून मोठा विरोध झाला, पण शेवटी सुजितचं म्हणणं सगळ्यांना पटलं. शेवटी ३० मे रोजी सुजितने स्वतःच्या पत्नीचं लग्न तिच्या बॉयफ्रेंडशी लावून दिलं. फक्त लग्नच नाही, तर तो त्या लग्नात नाचला देखील.
राव, अशा घटना फारच दुर्मिळ असतात. त्यामुळं सगळीकडे या लग्नाची चर्चा झाली. सोशल मिडियाने सुजितवर मीम्सदेखील बनवले.
मंडळी, तुमच्यातील कितीजणांना ही ष्टोरी ‘जुळून येती रेशीम गाठी’ची आठवण देऊन गेली ? सांगा बरं...