तुम्ही 'टल्ली' होण्यासाठीच पिता का ? तुमचा 'श्रावण' संपला असेल तर हे नक्की वाचा !!
कालच गणपती विसर्जन झालंय आणि बऱ्याच जणांचा 'श्रावण' संपला असेल. आता 'थोडी घ्यायला' हरकत नाही. असा मनात विचार आला असेल तर एका सर्वेक्षणाची निरीक्षणं जरूर वाचा. या सर्वेक्षणाच्या मते भारतीय फक्त 'टल्ली' होण्यासाठीच पितात. हा आरोप आहे की सत्य परिस्थिती आहे ? हे खाली दिलेली माहिती वाचून तुम्हीच आम्हाला सांगा.
१. दारु पिणार्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ३२ टक्के आहे आणि रोजच पिणार्यांची टक्केवारी फक्त १३ टक्केच आहे.
२. पिणारे टल्ली होण्यासाठीच पितात म्हणून दारुच्या अंमलाखाली होणार्या गुन्ह्यांची संख्या वाढते आहे.
३. जगभर पेग ३० मिलीचा असतो तर भारतात पेगचे माप ६० पासून पुढे सुरु होते म्हणजे स्टँडर्ड ६० मिली तर पटीयाला ९० !!
४. केरळमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले की तुरुंगात असलेल्या कैद्यांपैकी ५७ टक्के कैदी दारुच्या कैफात केलेल्या गुन्ह्यांमुळे आत आहेत.
५. हॉस्पीटलमध्ये किंवा डॉक्टरांकडे जाणार्या एकूण रुग्णात ३० टक्के प्रमाण दारुमुळे किंवा दारुच्या अतिसेवनामुळे उदभवलेल्या समस्या असलेल्या रुग्णांचे असते.
६. गुजरातमध्ये १९६० पासून दारुबंदी आहे पण १७ टक्के लोक नियमित दारु पितात.
७. दारु प्यायला सुरुवात करण्याचे वय आता दिवसेंदिवस घसरत जाते आहे. एकेकाळी दारू महाग होती आणि प्रतिबंधीत होती. नशा व्हावी म्हणून सिगरेटची राख ग्लासात मिसळण्याचे दिवस कधीच संपले, आता एखाद्या वस्तीत दवाखाना नसेल पण मयखाना नक्कीच असेल.
८. २००५ साली प्रती माणशी दारूचा खप २.४ लिटर होता. २०१६ साली हाच आकडा ५.७ लिटर इतका वाढला.
९. व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे बोगस डॉक्टरांचे फावते.
बऱ्याच सामाजिक संस्थांनी व्यसनमुक्ती केंद्रे सुरु केली आहेत. 'अल्कोहोलिक अनॉनिमस' सारख्या अनेक संस्था या कामात हातभार लावतातच. अशा संस्थांमध्ये डॉक्टर अनिल अवचट यांनी स्थापन केलेली ‘मुक्तांगण’ ही संस्था महाराष्ट्रात अग्रेसर आहे.
पत्ता : मुक्तांगण समुपदेशन केंद्र, मोहन वाडी, आळंदी रोड, येरवडा पुणे ४११००६




