computer

पुण्यात बनतील आता इ-रिक्षा : प्रवासी आणि मालवाहतूक, पण नो प्रदूषण...

(इ- रिक)

आजकाल प्रदूषणामुळे पर्यावरणाची खूप  मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचे आपल्याला खूप जाणवत आहे. या प्रदूषणामुळे इतरही समस्या आ वासून समोर उभ्या राहिलेया आपल्याला दिसत आहेत.  ग्लोबल वार्मिंग तर आहेच, पण अवेळी पाऊस आणि इतरही अशा बऱ्याच अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागत आहे.

आपल्या वाहनांमधून बाहेर फेकल्या जाणाऱ्या धुरामुळेही अशा समस्या वाढत आहेत याची आपण नोंद घेतली पाहिजे. मग या  गोष्टीला  पर्याय उपलब्ध आहे काय? होय,  इलेक्ट्रिक व्हेहिकल्स या गोष्टींवरील सर्वात उत्तम उपाय आहे. सिंगापूरमधील शाडो कंपनीने भारतामध्ये इलेक्ट्रिक व्हेहिकल्सचे उत्पादन करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी मुख्यतः ई-रिक्षा म्हणजेच इलेक्ट्रिक रिक्षांचे उत्पादन भारतात करणार आहे. या रिक्षांचा वापर प्रवाशांसाठी तसेच मालवाहतुकीसाठी ही करता येणार आहे. या रिक्षांमध्ये काय विशेष आहे ही आज जाणून घेऊयात... 

या रिक्षांचे नाव भारतामध्ये "इ- रिक" असे असणार आहे. शाडो कंपनीने भारतात दर महिन्याला हजार रिक्षांचे उत्पादन करण्याचे नियोजन केलेले आहे. या रिक्षांचे उत्पादन बंगलोरमधल्या  "अडायर इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी " या कंपनीमध्ये होणार आहे. कंपनीच्या सांगण्यानुसार रिक्षा एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ७० किलोमीटरपर्यंत बिनदिक्कत चालू शकते. अशा प्रकारची रिक्षा तुम्ही कुठल्याही वातावरणामध्ये चालवू शकता. म्हणजे अगदी  -25 ते 60 डिग्री सेल्सिअसपर्यंत ही रिक्षा कुठलीही विनातक्रार काम करू शकते.

(प्रातिनिधिक फोटो)

या कंपनीचे असे म्हणणे आहे की संपूर्ण आशिया खंडामध्ये फक्त शाडो कंपनीच "अल्ट्रा कॅपॅसिटर बॅटरी"चे उत्पादन करते. या बॅटरीचे वैशिष्ट्य म्हणजे बॅटरी इतर साधारण बॅटरपेक्षा वीसपट अधिक टिकते.  शाडो कंपनी या रिक्षांचे उत्पादन मुख्यतः दोन प्रकारांमध्ये करणार आहे. एक म्हणजे प्रवाशांसाठी आणि दुसरे म्हणजे मालवाहतुकीसाठी. मालवाहतुकीच्या रिक्षांमुळे भारतातल्या उद्योगाला एक पर्याय उपलब्ध होणार आहे. या पर्यायाच्या माध्यमातून ते कमी किमतीमध्ये त्यांचे उत्पादन वाहून नेऊ शकतात. 

शाडो कंपनी पुण्यात दहा दशलक्ष डॉलर गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे रिक्षाच्या उत्पादनाला लवकरच सुरुवात होईल. भारतीय लोकांना बेसिक रिक्षा आणि काहीतरी थोडीफार फीचर्स असली तरी चालतात. शाडो कंपनीने भारतीय ग्राहकांच्या या गरजा लक्षात घेऊन भारतीयांसाठी एक उपयुक्त असे वाहन तयार करण्यावरती भर दिलेला आहे.  ही कंपनी नवीन  उद्योजकांनाही या प्रकल्पामध्ये सामील करण्याचा विचार करत आहे. ते उद्योजकांना त्यांचे चार्जिंग पॉईंट्स बनवू देतील. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये जोपर्यंत पुरेसे चार्जिंग युनिट्स तयार होत नाही तोपर्यंत कंपनी मोठ्या प्रमाणावर रिक्षांचे उत्पादन करणार नाही.

केरळ ऑटोमोबाईल लिमिटेड या कंपनीनेही  जुलै 2019 मध्ये अशाच प्रकारच्या एका ऑटो रिक्षाची घोषणा केलेली आहे. ही रिक्षाही इकोफ्रेंडली म्हणजे प्रदूषणमुक्त असेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार या कंपनीने पुण्यातील "ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया" (ARIA) या संस्थेकडून ना हरकत प्रमाणपत्रही मिळवलेले आहे. अलीकडेच जगातील सर्वात मोठी प्रवासी वाहतूक करणाऱ्या uber या कंपनीनेही इ-रिकचा प्रयोग करण्यासंबंधी संमती दर्शवलेली आहे. यापुढे प्रवाशांना प्रदूषणमुक्त प्रवास करण्याचाही पर्याय उपलब्ध असेल.

गरजेला पुरी पडणारी गाडी, नो प्रदूषण आणि कमी खर्चात प्रवास.. हे सगळं मिळाल्यावर छोटे उद्योगधंदे चांगलीच प्रगती करतील, नाही का?

 

लेखक : रोहित लांडगे

 

आणखी वाचा :

ऑटो रिक्षाचं रुपडं पालटलं....आता मुंबईच्या रस्त्यांवर धावणार 'क्युट रिक्षा' !!

सबस्क्राईब करा

* indicates required