कारगिल युद्ध, रवीना, नवाझ शरीफ आणि जोर का झटका धीरेसे या सगळ्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे?

कारगिल विजयदिनाच्या निमित्ताने दोन फोटो व्हायरल होत होते. दोन्ही फोटोंमध्ये बॉम्ब दिसत होते. एकावर लिहिलेलं ‘From Raveena Tandon to Nawaz Sharif’ आणि दुसऱ्यावर लिहिलेलं ‘जोर का झटका धीरे से लगे’. चक्क बॉम्बवर असा मजकूर का लिहिला असावा? चला तर आजच्या लेखातून जाणून घेऊया.
कारगिल युद्धाच्यावेळी पाकिस्तानी सैनिक भारतीय सैनिकांना चिडवण्यासाठी म्हणायचे की, "आम्हाला माधुरी आणि रवीना टंडन द्या, आम्ही काश्मीर सोडून निघून जाऊ". माधुरी तर मिळाली नाही, पण भारतीय हवाईदलाने रवीना टंडनच्या नावाने बॉम्ब नक्कीच पाठवला. यात नवाज शरीफ कुठून आले असं तुम्हाला वाटेल, तर त्याचं असं आहे की रवीना टंडन ही नवाज शरीफ यांची आवडती अभिनेत्री होती. त्यामुळे हे बक्षीस त्यांच्याच नावे पाठवण्यात आलं होतं.
'जोर का झटका धीरे से लगे" या मजकुरामागे *ऑपरेशन सफेद सागर* आहे. पाकिस्तानी सैनिकांना साफ करण्यासाठी भारत सरकारकडून ही मोहीम आखण्यात आली होती. या मोहिमेसाठी भारताने त्यावेळच्या बलाढ्य अशा Mirage 2000, MiG-27 आणि MiG-21 विमानांचा उपयोग केला होता. या विमानांमध्ये लेझरद्वारे बॉम्बिंगची व्यवस्था होती. याचा वापर करून २४ जून १९९९ साली टायगर हिल परिसरात बॉम्बिंग करून तो भाग भारताने परत मिळवला.
कारगिलच्या युद्धात भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरली होती.
तर, हा होता त्या दोन फोटोंचा इतिहास. यानिमित्ताने भारतीय हवाई दलाने कारगिलच्या युद्धात दाखवलेला पराक्रम पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
आणखी वाचा :