रोटी बॅंक : औरंगाबादचा अनोखा आणि स्तुत्य उपक्रम
गोरगरीबांना , अडल्यानडल्यांना मदत करणं ठीकच, पण त्यातून भीक मागायला प्रोत्साहन मिळू नये याकडे बहुतेकांचा कल असतो. तेही अगदी ठीक. पण सगळ्यांना एका मापात तोलणंही बरोबर नाही. कधी कधी विपन्नावस्थेत खायला अन्न नसतं पण भीक मागणं कमीपणाचं वाटतं. वृद्धावस्थाही वाईट. काम करून पोट भरता येत नाही अन अन्नाशिवाय जगता येत नाही.
अजिंठा-वेरूळसाठी प्रसिद्ध असलेल्या औरंगाबादच्या चार युवकांनी २०१५ च्या डिसेंबर महिन्यापासून ’रोटी बॅंक’ नावाचा एक अनोखा उपक्रम चालू केला आहे. यात वृद्ध, बेघर, गरीब आणि बेरोजगार लोकांना अन्न पुरवलं जातं. मात्र भिकारी लोकांना थारा दिला जात नाही. बरेचदा मोठ्या कुटुंबात एकच कमावती व्यक्ती असते आणि त्यातून सर्वांची पोटं भरणं शक्य होत नाही. यातूनच युसुफ मुकाती यांना ही कल्पना सुचली. युसुफ मुकाती हे रोटी बँकेच्या संस्थापकपैकी एक आहेत.
ही बॅंक झिंसी-बाजीपुरा रोडवर आहे.
रोटी बॅंक कशी चालते:
१. नागरिक बँकेसाठी दाता म्हणून आपलं नांव नोंदवतात आणि त्यांना एक नोंदणी क्रमांक मिळतो.
२. अन्न जमा करताना प्रत्येक व्यक्तीस त्याच्या नोंदणी क्रमांकाची पिशवी मिळते. आणि दोन पोळ्या आणि एक प्लेट भाजी इतकी किमान मदत करता येते. दिवसातून अनेक वेळेसही हे अन्न आपण बॅंकेत जमा करू शकतो.
३. जमा केलेले अन्न चांगले आहे की नाही हे पाहून गरजू लोकांना दिले जाते. नोंदणी क्रमांकावरून कोणते अन्न कुणाला दिले गेले याचीही माहिती बॅंक ठेवते.
४. ही बॅंक सकाळी ११ वाजल्यापासून रात्री ११ पर्यंत चालते.
रोटी बॅंकेनंतर औरंगाबादमध्ये आता ’कपडा बॅंक’ही चालू झाली आहे.