या जुळ्यांना का व्हायचं नाही एकमेकांपासून वेगळं ??
या भावंडांची नावं आहेत शिवराम आणि शिवनाथ. दोघांची शरीरं कमरेपासून जोडलेली आहेत. असं म्हणतात की या प्रकारची वैद्यकीय केस ही लाखात एक असते. अशा मुलांच्या बाबतीत नेहमीच वैज्ञानिक सल्ला घेतला जातो. त्यांना वेगळं करण्याचे प्रयत्न केले जातात. काही केसेसमध्ये ते शक्य असतं तर काही केसेसमध्ये दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होतो. पण शिवराम आणि शिवनाथ यांची केस थोडी वेगळी आहे.
शिवराम आणि शिवनाथ यांनी ‘वेगळं’ होण्यास नकार दिला आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर ‘म्हातारपणापर्यंत’ त्यांना अशाच अवस्थेत राहायचं आहे. त्यांचे आईवडील राजकुमार साहू आणि त्यांच्या पत्नीचीही हीच इच्छा आहे. आता तुम्ही म्हणाल की याला आर्थिक कारण जबाबदार असेल तर तसं नाहीये. राजकुमार साहू यांनी म्हटलंय की आमच्याकडे पैसे असते तरी आम्ही आमच्या मुलांवर शस्त्रक्रिया केली नसती. मग याला कारण काय ? याला कारण आहे जुन्या समजुती !!
छत्तीसगडच्या एका लहानशा गावात जेव्हा दोघांचा जन्म झाला तेव्हा गावासाठी हे एक नवल होतं. गावकऱ्यांनी त्यांची चक्क पूजा केली होती. दोघांच्या आई वडिलांनी याला नशिबाचा भाग समजलं. डॉक्टरांनी सल्ला दिला की दोघांना यशस्वीपणे वेगळं करता येईल. पण कदाचित त्यांच्या पक्क्या समजुतींमुळे त्यांनी शस्त्रक्रियेस नकार दिला.
मंडळी, हे काही वेगळं सांगायला नको की दोघांना दैनंदिन कामात अनेक अडचणी येतात. उदाहरणच द्यायचं झालं तर एकाला बसायचं असेल तर दुसऱ्याला झोपावं लागतं. एकमेकांशिवाय दोघांना काहीच काम करता येत नाही. एवढ्या अडचणी असूनही दोघे एकमेकांना चांगल्या प्रकारे सांभाळून घेतात. दोघांचे शरीर अशा प्रकारे जोडले आहेत की दोघांना दोन पायांवर चालता येत नाही. यासाठी त्यांनी हात आणि पायांचा चालण्यासाठी वापर कसा करायचा ते शिकून घेतलं आहे. शाळेत जाण्यासाठी त्यांना अपंगांची सायकल देण्यात आली आहे. त्याचाही वापर ते अगदी सहज करतात. याशिवाय घरातल्या कोणाचीही मदत न घेता त्यांची रोजची कामे पार पडतात. एवढंच काय दोघेही शाळेत हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणले जातात. एखाद्या साधारण मुलासारखा दोघांचा वावर बघून गावकऱ्यांसोबतच डॉक्टरही चकित झाले आहेत.
चला तर मंडळी आता शिवराम आणि शिवनाथ यांचा हा व्हिडीओ पाहून घ्या.