computer

तब्बल १३० वर्षांनी '१ किलो'चं माप बदलणार....याचा आपल्यावर काय परिणाम होईल ??

मंडळी, १८८९ साली ‘१ किलो’ वजनाची व्याख्या ठरवण्यात आली होती. हेच मोजमाप पुढे जगभरात मान्य करण्यात आलं. आज जवळजवळ १३० वर्षांनी हे माप बदललं गेलं आहे. हे माप बदलण्याची गरज का पडली ? याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होईल? नवीन मोजमापात काय फरक असेल ? चला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया!!

१ किलो वजनाचा पूर्वज - ‘Le Grand K’

१८८९ साली १ किलो वजनाचं शुद्ध रूप म्हणून ‘Le Grand K’ या प्लॅटिनम आणि इरिडियम धातूंच्या मिश्रणातून तयार करण्यात आलेल्या दंडगोलास मान्यता देण्यात आली. हा दंडगोल पॅरीस येथे जतन करण्यात आला आहे. ‘Le Grand K’ च्या आधारे जगभरातील देशांनी आपापली वजने तयार केली होती. पण शुक्रवारी फ्रान्सच्या व्हर्साय येथे झालेल्या ‘वजने आणि मापेविषयक परिषदेत’ हे मूळ वजनाला आव्हान देण्यात आलं. शेवटी हे जुनं माप बदलण्यात आलं आहे. या परिषदेत ५० पेक्षा जास्त देशातले शास्त्रज्ञ हजर होते. 

१३० वर्षांनी ‘Le Grand K’ ला रद्दबादल का करण्यात आलं ?

Le Grand K ला १८८९ साली तयार केल्यानंतर त्याच्या प्रतिकृती जगभरात वाटण्यात आल्या होत्या. पण पुढे जाऊन Le Grand K आणि त्याच्या प्रतिकृतींमध्ये सूक्ष्मसा बदल दिसू लागला. सर्वसामान्य माणसाला या लहानशा फरकाने फारसा फरक पडणार नाही पण जगभरातल्या काही महत्वाच्या क्षेत्रांमध्ये एका केसाच्याही वजनाचं फार महत्वं असतं. जसे की नॅनो टेक्नोलॉजी, औषध निर्मिती किंवा इंजिनियरिंगच्या काही शाखांमध्ये. अशा ठिकाणी हे वजन अगदी अचूक असणं महत्वाचं असतं. त्यामुळे ‘Le Grand K’ ला निवृत्त करण्यात आलं आहे. 

नवीन मोजमाप कोणतं असेल ?

मोठ्या प्रमाणातील भंगारचं वजन उचलण्यासाठी विद्युतचुंबकीय शक्तीचा वापर केला जातो. येऊ घातलेल्या नवीन मोजमाप प्रणालीत याच विद्युतचुंबकीय शक्तीच्या द्वारे अचूक मोजमाप ठरवण्यात येणार आहे. या पद्धतीला परिषदेत जमलेल्या शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणावर मान्यता दिली आहे.

विद्युतचुंबकीय शक्तीद्वारे कशाप्रकारे माप ठरवण्यात येईल ?

एक ठराविक विद्युत चुंबकीय शक्ती निर्माण होण्यामागे त्याला पुरवला गेलेला विद्युत प्रवाह कारणीभूत असतो. याचाच अर्थ वजन आणि वीज यांच्यात नक्कीच संबंध आहे. एक ठराविक वजन उचलण्यासाठी किती प्रमाणात वीज लागते यावरून नवीन १ किलोचं माप ठरवण्यात येणार आहे. 

याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होईल का ?

सर्वसाधारण माणसावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. आपल्याकडे आजही खेड्यापाड्यात वजन काट्याला माप म्हणून दगडही वापरला जातो. तर भाऊ अशा प्रकारच्या पारंपारिक पद्धतींवर यामुळे परिणाम होणार नाही. फरक पडेल तो वर उल्लेख केलेल्या नॅनो टेक्नोलॉजी आणि औषध निर्मिती क्षेत्रांसारख्या काही विशिष्ट क्षेत्रांवर.

तर मंडळी, तब्बल १३० वर्षांनी आपलं १ किलोचं माप निवृत्त होत आहे. पण सर्वसामान्य माणसाला चिंता करण्याची अजिबात गरज नाही !!

सबस्क्राईब करा

* indicates required