computer

लोकडाऊन उद्योग: जगातली अनेक शिखरे पादाक्रांत करणारा हा तरुण आता काय करतोय पाहा

काळाचौकी, मुंबई येथे राहणारे गिर्यारोहक वैभव ऐवळे यांनी टाळेबंदी जाहीर झाल्यापासून रोज २१ हजार पावले आणि कमीतकमी ११ किमीचे अंतर चालायचे असा निश्चय केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक दुरावा म्हणजेच social distancing चे आणि शासनाने दिलेले सगळे नियम पाळत ते घराबाहेर असलेल्या सामूहिक गॅलरी त्यांनी चालायला सुरवात केली. त्यांच्या गॅलरीची लांबी फक्त १५ ते १८ फूट आहे. तिकडे वैभव दिवसाचे जवळजवळ ५-६ तास चालतो.  म्हणजे पाहा- पहाटे २ तास, दुपारी २ तास आणि रात्री १ ते १.५ तास. आहे ना विलक्षण!! 

वैभव यांनी आजपर्यंत सह्याद्री पर्वाततली अनेक गडशिखरे आणि घाटवाटा पादक्रांत केल्या आहेत. इतकंच नाही तर जगातल्या दोन खंडातली दोन सर्वोच्च शिखरे देखील त्यांनी सर करून भारताचा स्वातंत्र्यदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करत जागतिक विक्रम केला आहे. यावर्षी वैभवची ऑस्ट्रेलिया खंडातले सर्वोच्च शिखर सर करण्याची तयारी चालू होती. पण सध्याच्या परिस्थतीमुळे आता तिकडे जाणे अशक्यच आहे. तरीही यंदा ही काहीतरी वेगळी मोहीम नक्कीच करेन असं ते असा ठाम विश्वासाने म्हणतात.

महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणजे कळसूबाई शिखराचे पायथ्याजवळच्या बारी गावापासून कळसूबाई शिखरापर्यंतचे अंतर हे जवळजवळ ६ ते६.५ किमी आहे. हे अंतर कापायला जवळजवळ ५ ते५.५ तास वेळ लागतो. इतका वेळ वैभव घरच्याघरी रोज चालतात. या व्यतिरिक्त ते ३०मिनिटे योगासने करतो, २०० दोरीवरच्या उड्या मारतात आणि घरच्याघरी करता येण्यासारखे शारीरिक व्यायामाचे प्रकारही रोज करतात. म्हणजेच तसे बघितले तर वैभवनी गेल्या ५० दिवसांत दिवसातून किमान एकदा कळसूबाई शिखर चढण्याएवढं अंतर पार केले आहे. 

लॉकडाऊन बद्दल सांगताना वैभव म्हणतात की ही टाळेबंदी नव्हे हा तर आपला दुसरा जन्मच आहे आणि हा जन्म खरंतर आपण फक्त आणि फक्त डॉक्टर, पोलिस, सफाई कामगार आणि सगळेच जे अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत यांच्यामुळेच पाहात आहोत. ह्या परिस्थितीत आपले वैयक्तिक आयुष्य सोडून देशासाठी, समाजासाठी कार्य करणे यापेक्षा मोठा त्याग नाही असंही त्यांना वाटतं. 

म्हणूनच सर्वस्व पणाला लावून मोठ्या जिद्दीने लढा देणाऱ्या सर्वच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वैभव ऐवळे अशी आगळीवेगळी मानवंदना देत आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required