सोशल मिडिया गाजवणाऱ्या एप्रिल मधल्या टॉप ५ घटना !!!
मागच्या काही दिवसांत सोशल मिडीयावर जामच उलथापालथ झालीय. तशा अनेक ऐतिहासिक घटनाही घडल्या. स्नॅपचॅटच्या मालकानं आपल्याला गरीब म्हटल्यावर जनतेने एकवटून त्याची जी काशी केली ती घटना असेल किंवा सोनू निगमने मशिदीच्या भोंग्याविषयी केलेलं वादग्रस्त ट्विट. एका पाठोपाठ आलेल्या या तडाख्यात सोशल मिडिया ढवळून निघाला...अशाच काही घटनांचा एक आढावा घेऊया मंडळी !
1. १३ एप्रिलला आपल्या सचिनच्या सिनेमाचा ट्रेलर आला. उलटसुलट प्रतिक्रियांना या निमित्ताने उधाण आलं. करोडो लोकांनी हा ट्रेलर बघितला आणि शेअर केला.
याविषयी वाचा इथं...
सचिनची फलंदाजी मोठ्या पडद्यावर...बघा ट्रेलर !!!
2. यानंतर काही दिवसातच सोशल नेटवर्किंग अॅप स्नॅपचॅटचे सिईओ इवान स्पिगलने भारताविषयी नको ते बोलून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. ‘स्नॅपचॅट हे फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे. भारत आणि स्पेन सारख्या गरिब देशात मला ते वाढवण्याची इच्छा नाही.’ असं बेजबाबदार वक्तव्य केल्यानं भारतीयांनी स्पिगल यांचा चांगलाच समाचार घेतला. रागाच्या भरात काही अतिउत्साही लोकांनी स्नॅपचॅटच्या जागी स्नॅपडीलवर निशाणा साधला ते वेगळंच.
याविषयी तुम्ही इथे सविस्तर वाचू शकता !!!
स्नॅपचॅटने भारताला गरीब म्हटलं... आता फजिती झाली ना भाऊ !!!
3. हे शांत होतंय न होतंय तोच १७ एप्रिलला सोनू निगम बोलला आणि नवीन वादाला तोंड फुटलं. मशिदीवरील भोंग्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल सोनू निगमने ट्विटरवर आपले मत मांडलं पण अर्थात ते ट्विट वादग्रस्त असल्यानं अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला.
एवढंच, काय सोनू निगमच्या विरोधात पश्चिम बंगालचे अल्पसंख्याक युनायटेड काऊन्सिलचे उपाध्यक्ष ‘सय्यद शाह आतेफ अली कादरी’ यांनी असा फतवा काढला कि जो कुणी सोनू निगमचं मुंडण करुन त्याला जुन्या चपलांचा हार घालेल त्या व्यक्तीला आपण 10 लाख रुपयांचे बक्षीस देऊ!!!
यातही गम्मत म्हणजे सोनू निगमच्या जागी काहींनी सोनू सूदला धारेवर धरलं! एकंदरीत काय तर, सोनूचा स्नॅपडील झाला.
4. अरबपती बी. आर. शेट्टी तब्बल १००० कोटी गुंतवून ‘महाभारत’ जागतिक पडद्यावर साकारणार असल्याची मोठ्ठी बातमी दोन दिवसापूर्वी आली. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू तसंच अनेक परदेशी भाषांमध्येही बनणार आहे. यातल्या भीमाच्या भूमिकेसाठी मोहनलालची निवड करण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे. हा सिनेमा २०२० साली प्रदर्शित होईल.
काही महिन्यांपूर्वी अमीर खान, मोहनलाल आणि रजनीकांतला घेऊन एस. एस. राजमौली महाभारत बनवणार असल्याची चर्चा होती. बाहुबली नंतर या सिनेमावर काम करणार असल्याचं राजमौलीने सांगितलंय.
दोन्ही सिनेमे मोठ्या पडद्यावर बघणे म्हणजे मेजवानीच असेल यात शंका नाही.
5. आता यापुढची घटना फारच मजेशीर आहे मित्रांनो. काल म्हणजे १८ एप्रिल रोजी कर्जबुडव्या विजय मल्याला अटक झाली. पण बँकांनी आनंद साजरा करायच्या आतच अवघ्या ३ तासात मल्याला जामीनावर सोडण्यात आलं.
यावर सोशल मिडीयाच्या तज्ञांनी म्हटलंय की ‘पिज्जा डिलिवरी पेक्षा मल्याची बेल जास्त फस्ट आहे’!!!
तर या सर्व घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला नक्की कळवा !!!