लॉकडाऊनमध्ये अडकलेला अंपायर गावासाठी देवदूत ठरला!! त्यांनी असं नक्की काय केलं?

कोरोनामुळे सगळंच ठप्प झाले आहे. सगळ्यांना आपापले कामधंदे सोडून घरी बसावे लागले, त्यात काही आपल्या गावी परतले. क्रिकेटची पण अवस्था तशीच आहे. भारतीय अंपायर अनिल चौधरी हे पण सध्या रिकामा वेळ असल्याने गावी गेले. तर गावाला जाऊन इतर काही टाईमपास करण्यापेक्षा त्यांनी थेट गावात मोबाईलचे टॉवर आणले.
उत्तरप्रदेशमधील शामली जिल्ह्यातले डांगरोल हे त्यांचे गाव. या गावात मोबाईलचे नेटवर्क नाहीय. या कारणाने चौधरी यांना आंतरराष्ट्रीय अंपायर्सच्या कार्यशाळेत भाग घेता येत नव्हता, तसेच कुणाशी संपर्कसुद्धा करता येत नव्हता. त्यांनी आहे ती परिस्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला.
अनिल चौधरी यांनी आतापर्यंत २० वनडे आणि २८ टीट्वेन्टी मॅचेसची अंपायरिंग केली आहे. नेटवर्कसाठी झाडावर चढावे लागत असे, तेव्हा कुठे थोडेफार नेटवर्क मिळत असे. गेली कित्येक वर्षे तिथले गावकरी मोबाईल टॉवरसाठी सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत होते. पण अनिल चौधरी यांनी कंबर कसली आणि गावात नेटवर्क आले.
अनिल चौधरी सांगतात की सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू आहेत. त्यांना खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने गावात नेटवर्क असणे काळाची गरज होती. चौधरी भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणाऱ्या वनडे मॅचेसची अंपायरिंग करणार होते पण मध्येच लॉकडाऊन झाल्याने त्यांना आपल्या मूळ गावी परतावे लागले.