दणाणा हॉवीट्जर तोफांचा - भारतीय लष्कराच्या चाचण्या सुरु !!
बोफोर्स तोफांच्या गलबल्यानंतर आता तीस वर्षांनी हॉवीट्जर तोफा प्रत्यक्ष सीमेवर नेण्याची तयारी आता भारताने सुरु केली आहे. या आठवड्यापासून सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत M-777 A-2 ultra-light howitzer या चाचण्या पोखरणच्या रणात घेतल्या जाणार आहेत.
१९८० च्या कथित बोफोर्स घोटाळ्यानंतर लष्करासाठी तोफांची खरेदी जवळ जवळ थांबली होती. २०१० नंतर हॉवीट्जर तोफा घेण्याच्या चर्चा अमेरीकेसोबत सुरु झाल्या. अमेरीकेची पहिली ऑफर ६४७ मिलीयन डॉलर्सची होती. त्यानंतर चर्चा थंडावल्या. ऑगस्ट २०१३ साली अमेरीकेने दुसरी ऑफर दिली तब्बल ८८५ मिलीयन डॉलर्सची. ही ऑफर भयानक महाग असल्याने चर्चा पुन्हा एकदा थंडावल्या.
मे २०१५ मध्ये भारताने सुधारीत मागणी नोंदवली आणि २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यात पेंटागॉनने १२० तोफा ७३७ मिलीयन डॉलर्स देण्याचे निश्चित केले. आता जवळ जवळ ४८०० कोटी रुपये खर्च करून १४५ तोफा घेण्याचा निर्णय भारत सरकारने घेतल्यावर आता काही तोफा भारतात पोहचल्या आहेत. यापैकी २५ तोफा रेडी टू फायर असतील तर बाकीच्या तोफा सुट्या भागात येऊन त्याची जुळणी महिंद्रा अँड महिंद्रा ही भारतीय कंपनी करणार आहे.
काय आहेत या तोफा आणि काय आहे खास या तोफांमध्ये हे आज आपण वाचू या !!
आधीच्या तोफांपेक्षा ही खास कशी ?
M-777 A-2 ultra-light howitzer या तोफा आधीच्या तोफांपेक्षा ४१ टक्के कमी वजनाच्या आहेत. आधीच्या तोफा सात टन वजनाच्या होत्या तर ही नवी तोफ चार टनाची आहे. टिटॅनीयम या खास धातूचा वापर करून हे वजन कमी करण्यात आले आहे.
तर मग इतकी जड तोफ दुर्गम सीमा भागात नेऊन ठेवणार कशी ?
सीमेवर रस्ता असेल तेथे या तोफा खास ट्रकद्वारा ओढत नेल्या जातील आणि दुर्गम भागात हेलीकॉप्टरच्या साह्याने "स्लींग लोड" या तंत्राने पोहचतील.
नेमके लक्ष्य गाठण्यास काही विशेष तंत्र यात आहे का ?
अर्थातच आहे. या तोफा डिजीटल फायर कंट्रोल सिस्टीम सहीत आहेत आणि गरज भासल्यास जीपीएस कंट्रोल असलेल्या M 982 Excalibur या उपकरणाला पण त्या जोडता येतात.
या तोफांचा पल्ला किती आहे ?
साधारण १००० वर्ग किलोमीटरचा परिसर सहज व्यापता येईल आणि त्यांची रेंज २४ किमीची असेल. जर तोफेला M 982 Excalibur जोडले तर लक्ष्य भेदण्यात फार तर १६ फूटांची चूक होऊ शकेल.
आता जर चाचण्या चालू आहेत तर प्रत्यक्ष उपयोग कधी होईल ?
बीएइ सिस्टीम आणि महिंद्र-महिंद्र सराव तोफा २०१९ पर्यंत तयार करतील आणि त्यानंतर त्या प्रत्यक्ष वापरात येऊ शकतील. तोपर्यंत २५ रेडी टू फायर तोफा लष्कराच्या दिमतीला असतील.
युद्ध होऊ नये असं कितीही वाटत असलं तरी युद्धाला तोंड देण्याची तयारी मात्र असायलाच हवी.