computer

झाडं लावली नाहीत तर घर मिळणार नाही...परदेशात नाही, भारतातच आलाय असा कायदा !!

सध्या संपूर्ण जग सामोरे जात असलेली कुठली समस्या असेल तर ती म्हणजे पर्यावरणाचा नाश!! अनेक शास्त्रज्ञ गळा खरवडून  सांगत आहेत की अजूनही वेळ गेलेली नाही, आपण पृथ्वी वाचवू शकतो. पण अगदी काहीच वर्षांनी जर आपण सकारात्मक पाऊले उचलली नाहीत तर आपल्या डोळ्यांदेखत पृथ्वीचा नाश बघण्याची वेळ आपल्यावर येण्याची शक्यता आहे राव!!

ग्लोबल वॉर्मिंग, दरवर्षी अधिकच दाहक होत चाललेला उन्हाळा, ऍसिड पाऊस.. यावर उपाय काय आहे माहीत आहे का मंडळी? तर जास्तीत जास्त झाडे लावणे!! मंडळी, एवढा सोपा उपाय करून आपण पृथ्वी वाचवू शकतो.

कळतं पण वळत नाही हे तर आपलं नेहमीचंच असतं. जर तुम्ही झाडे लावायला आळस करत असाल तर तुमच्या महानगरपालिकेने केरळमधील कोडंगल्लूर या शहरापासून प्रेरणा घेणे गरजेचे आहे राव!! तुम्ही म्हणाल असे काय वेगळे केले बुवा त्यांनी? तिथल्या पालिकेने असा नियम केला आहे कि प्रत्येक घराच्या कंपाऊंडमध्ये कमीतकमी दोन तरी झाडे असायलाच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला घराचे मालकी प्रमाणपत्र मिळणार नाही. जर तुमच्या घराच्या कंपाऊंडमध्ये झाड नाही, याचा अर्थ तुमच्या घराचे रजिस्ट्रेशन होणार नाही.

झाड लावले म्हणजे तुमचे काम संपले असे समजू नका राव!! आपल्याकडे लई हुशार लोकं आहेत तशी स्कीम असली कि रजिस्ट्रेशन होते तोवर झाडे लावून देतील. पण तिथले पालिकावाले जास्त हुशार आहेत. तुम्ही झाड लावल्यावर लगेच तुमचे घर रजिस्टर होणार नाही. तुमच्या घराच्या कंपाऊंडमध्ये आंबे, फणस किंवा तसेच कुठले तरी झाड आहे का? आणि त्याची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे का? हे पाहायला पालिकेचे अधिकारी येतात आणि मग तुम्हाला घर रजिस्टर झाल्याचे सर्टिफिकेट मिळते. 

मंडळी, तुम्ही म्हणाल जिथे घर बांधायला जेमतेम जागा असते तिथे कंपाऊंड तयार करणे आणि तिथे झाडे लावणे कसे शक्य होईल? तर त्यांनी त्याचाही विचार करून ठेवला आहे राव!! तुमचे घर १५०० स्क्वेअर फूटपेक्षा जास्त मोठे असेल तरच तुम्हाला झाड लावणे कम्पलसरी आहे. कोडुंगल्लूर ही अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी आणि पर्यावरण रक्षणासाठी एवढ्या तत्पर निर्णय घेणारी भारतातली पहिली महानगरपालिका ठरली आहे. 

मंडळी, कोडुंगल्लूरने एक खूप चांगला आदर्श घालून दिला आहे. प्रगती करत असताना आपल्या भावी पिढ्यांचा पण विचार करणे गरजेचे आहे. एवढी मोठी समस्या फक्त झाडे लावण्याने संपत असेल तर प्रत्येकाने झाडे लावायला पाहिजे. त्याचबरोबर कोडुंगल्लूर महानगरपालिकेने घेतलेल्या कौतुकास्पद निर्णयाचे अनुकरण सगळ्या मोठ्या पालिकांनी पण करणे गरजेचे आहे राव!! सरकारी स्तरावर जेव्हा कामे होतात तेव्हा त्याचा मोठा प्रभाव पडतो राव!!

मंडळी, जेवढी जास्त झाडे आपण लावू तेवढे पर्यावरण बचावात आपण हातभार लावू शकतो. आणि हे आम्ही काही नविन सांगत आहोत असे नाही किंवा तुम्ही पण ही गोष्ट पहिल्यांदा ऐकत आहात असेही नाही. मंडळी, तरी आजवर तुम्ही किती झाडे लावली असतील? किमान वाढदिवसाला किंवा चांगल्या गोष्टीला सुरवात करत असताना निदान एक झाड लावणे तरी बनता है बॉस!!

मित्रांनो, अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल इतरांना पण माहिती व्हावी म्हणून हा लेख जास्तीत जास्त शेयर करा...

 

आणखी वाचा :

पास व्हायचं असेल तर १० झाडे लावा....कोणी केलाय हा अजब कायदा ??

हे तर खरोखरचे मनी प्लांट...या झाडाला खरंच पैसे लागून राह्यले ना भाऊ !!

एकाच झाडावर येतात ४० वेगवेगळी फळे ? कोणी केलीय ही कमाल ??

या झाडाला ‘मर्डर ट्री’ का म्हणतात ? माहिती वाचून घाम फुटेल भौ !!

सबस्क्राईब करा

* indicates required