जेव्हा अनुष्कासाठी गिफ्ट घेण्यासाठी विराट वेषांतर करून बेंगलोरच्या बेकरीत गेला, वाचा तिथे नेमकं काय घडलं..
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. परंतु २०१९ नंतर त्याला साजेशी कामगिरी करता आली नाहीये. त्याने २०१९ मध्ये बांगलादेश विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये. तसेच आयपीएल २०२२ स्पर्धेत देखील तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. या हंगामात तो दोन वेळेस गोल्डन डकवर बाद होऊन माघारी परतला आहे. क्रिकेट कारकिर्दीतील कठीण काळ सुरू असताना देखील त्याने बेंगलोरमध्ये घडलेला एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.
विराट कोहली आणि प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघेही २०१८ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. विरुष्का नावाने प्रसिध्द असलेली ही जोडी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. दोघेही आपल्या दैनंदिन आयुष्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. परंतु अनेकांना ही बाब माहीत नसेल की, अनुष्का शर्माला गिफ्ट देण्यासाठी विराट कोहली चक्क बेंगलोरच्या एका बेकरीमध्ये वेषांतर करून गेला होता. मुख्य बाब म्हणजे त्याला कोणीही ओळखले नव्हते.
आरसीबी इंसाईडरला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीने हा किस्सा सांगितला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका सुरू होती. मालिकेतील तिसरा कसोटी सामना हा बेंगलोरच्या मैदानावर सुरू होता. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर विराट कोहली थॉम्स नावाच्या एका बेकरीमध्ये गेला होता.
अनुष्का शर्माचं बालपण हे बेंगलोरमध्ये गेलं आहे. त्यामुळे बेंगलोरमध्ये तिच्या खूप जुन्या आठवणी देखील आहेत. ती थॉम्स बेकरीतील पफ्सचा नेहमी उल्लेख केला होता. विराट कोहलीला ही बाब कळताच त्याने थॉम्स बेकरीकडे धाव घेतली. डोक्यावर कॅप आणि तोंडावर मास्क लावून तो बाहेर पडला. त्याला भिती वाटत होती की, गर्दीत गेल्यानंतर त्याची ओळख पटली तर लोकं खूप गर्दी करतील . सेक्युरीटीला बोलवण्याची गरज पडेल. परंतु असे काहीच झाले नाही.
विराट जेव्हा तिथे पोहोचला त्यावेळी त्याला कोणीही ओळखू शकले नव्हते. त्याला भिती याच गोष्टीची वाटत होती की, जेव्हा तो बिल भरण्यासाठी जाईल त्यावेळी तिथे दिसून येईल की, हा तर विराट कोहली आहे. परंतु थॉम्स बेकरीतील कर्मचारी कामात इतके गुंतलेले होते की, त्यांनी त्याच नाव देखील पाहिलं नाही आणि विराटची तिथून सुटका झाली.